• Thu. Mar 12th, 2026
    Raj Thackeray: अर्जमाघारीसाठी उमेदवारांना कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

    Raj Thackeray Targets BJP: पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि तुम्हीसुद्धा ५-५ हजारांना विकले जाता आहात, उद्या तुमच्या मुलांना तुम्ही काय सांगणार आहात, याचा विचार करा, असे राज ठाकरे यांनी नागरिकांना म्हटले.

    thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘ठाकरी तोफ’ सोमवारी ठाण्यात संयुक्त सभेत धडाडली. सत्ताधारी पक्षाने उबाठा-मनसेच्या ज्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोटींची ऑफर दिली. त्यांना सभेच्या मंचावर पाचारण करत ठाकरे बंधूंनी पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला. उद्योगपती गौतम अदानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागत आरोपांची राळ उडवली.

    ठाण्यातील शिवसेना (उबाठा), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) उमेदवारांच्या प्रचारार्थ गडकरी रंगायतनच्या चौकात सभा झाली. ठाणे हे केवळ महानगरपालिका किंवा निवडणुकीपुरते मर्यादित शहर नाही, तर मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा इतिहास असलेले शहर आहे. ठाण्यासह आजूबाजूच्या शहरांच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे कारस्थान सध्या सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

    Maharashtra TimesRaj Thackeray: ‘माझ्या घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं मी झाकायची का?’, राज ठाकरेंचं अदानींसोबतच्या फोटोवर स्पष्टीकरण
    आमची युती जागावाटपासाठी नाही, तर मराठी माणसाला जागे करण्यासाठी आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. उद्योगपतींच्या प्रभावाखाली देश आणि राज्य चालवले जात असल्याचा आरोप करत विकासाऐवजी विनाशाची गती सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

    पैसे वाटण्याची गरज का भासते- राज ठाकरे
    निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून उद्यापासून उघडपणे पैसेवाटप सुरू होईल. पण विकासाचा दावा करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेकडून घराघरांत पाच हजार रुपये वाटले जात आहेत. जर विकास केला असेल, तर पैसे वाटण्याची गरज का भासते, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.भाजपवाले मतांसाठी पैसे वाटत आहेत, आणि एकनाथ शिंदे यांची मंडळी त्यांना पकडतात, एवढा पैसा यांच्याकडून येतो कुठून’, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

    Maharashtra Timesअरे किती खोटं बोलाल? राज ठाकरेंनी भरसभेत फडणवीस, अन्नामलाईंचा VIDEOच दाखवला, पार्श्वसंगीतही खास
    ‘त्या’ आरोपीकडे गुपिते होती का?
    ‘बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधमांना ठार मारलेच पाहिजे होते. पण एन्काऊंटरमध्ये का मारले, त्यामुळे काही गुपित उघड होणार होते का’, असा प्रश्न राज यांनी उपस्थित करत, ‘त्यातील सहआरोपीला स्वीकृत नगरसेवकपद देण्याची भाजपची हिंमत कशी होते, कारण तुम्हाला गृहीत धरले जाते. ५ हजार फेकले की तुम्ही विकले जाता’, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा