• Sun. Mar 8th, 2026
    महापौर मराठीच! शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेत फडणवीस, शिंदे यांची ग्वाही

    मुंबई : काहीही झाले तरी मुंबईचा महापौर मराठीच होईल आणि कोणाचाही बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रपासून वेगळे करता येणार नाही’, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी भाजप-शिवसेना महायुतीच्या संयुक्त सभेत दिली. ठाकरे बंधू मुंबईचे अस्तित्व टिकविण्यासाठी नव्हे, तर स्वत:चे अस्तित्व पणाला लागले आहे म्हणून एकत्र आले आहेत, असा आरोपही दोन्ही नेत्यांनी केला. मराठी माणसाला मुंबईत हक्काचे घर आणि रोजगार मिळवून द्यायचे असल्याचा शब्दही त्यांनी दिला.

    शिवाजी पार्कवरील या सभेला भाजपकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रवींद्र चव्हाण, विनोद तावडे, आशीष शेलार, अमित साटम, तर शिवसेनेकडून रामदास कदम, उदय सामंत, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे आणि रिपाइं आठवले गटाचे रामदास आठवले उपस्थित होते. याशिवाय भाजप-शिवसेना महायुतीचे २२७ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

    Devendra Fadanvis: मुख्यमंत्री फडणवीसांचंही ‘लावरे तो व्हिडिओ’, ठाकरे बंधूंची कुरघोडी जाहीर सभेत दाखवली
    हिंदीसक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात कसा झाला याचे स्पष्टीकरण फडणवीस यांनी यावेळी केले. काँग्रेसशासित राज्यांमध्ये अदानी समूहाची कशी हजारो कोटींची गुंतवणूक आहे, याचे दाखले देत फडणवीस यांनी राज यांच्या आरोपांना उत्तर दिले.

    फडणवीस ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, ‘२५ वर्षे महापालिकेत तुम्ही खुर्च्या तोडण्याचे काम केले. आदित्यशी चर्चा करा असे मला आव्हान देता. आदित्यशी चर्चा करायची असेल तर आमची उमेदवार शीतल गंभीर तुम्हाला पुरेशी आहे.’ मुंबईकरांसाठी शेवटची निवडणूक, मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असे सांगायचे, मात्र हा तो मराठी माणूस आहे ज्याने अटकेपार झेंड लावले आहेत. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची नव्हे, तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे, असा टोला लगावला.

    ठाकरे बंधूंनी रविवारच्या संयुक्त मेळाव्यात उद्योगपती अदानींवर केलेल्या टीकेलाही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. एका उद्योगपतींच्या नावाने खोटे कथन पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. धारावीसह नवी मुंबईचे विमानतळ कुणी दिले, असा संतप्त प्रश्नही त्यांनी केला. सत्तेवर असताना एक आणि सत्तेवर नसताना थेट घूमजाव अशी त्यांची दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही शिंदे यांनी यावेळी ठाकरे बंधूंचे नाव न घेता केली.
    Maharashtra Times‘लंडनमध्ये का जीव अडकलाय? घबाड आहे? माझ्याकडे सगळी माहिती’, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा इशारा
    मराठी माणूस संकटात आहे; तर मग गेली ३० वर्षे तुम्ही कंचे खेळत होता का? महापालिकेत २५ वर्षे तुमची सत्ता असूनही मराठी माणूस संकटात असेल, तर ‘चुल्लू भर पानी में डूब मरो’, – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ही प्रचारसभा नव्हे, परिवर्तनाची नांदी आहे. पैशासाठी मुंबईकरांच्या जिवाशी खेळण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले. जिथे जिथे टेंडर, तिथे तिथे तुम्ही सरेंडर. –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed