• Mon. Mar 9th, 2026

    पाऊल टाकण्याआधी 100 वेळा…; तब्बल 35 हजार नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार; बॅनर झळकले

    पाऊल टाकण्याआधी 100 वेळा…; तब्बल 35 हजार नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार; बॅनर झळकले

    मुंबईतील जुहू परिसरात पुनर्विकास रखडल्याने आणि मिलिटरी रडारच्या त्रासामुळे नागरिक संतप्त आहेत. ३५ हजार रहिवासी असलेल्या २०० इमारती आणि २ झोपडपट्ट्यांचा प्रश्न गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुरु असताना उच्चभ्रू परिसर अशी ओळख असणाऱ्या जुहू मधील ३५ हजार नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जुहू परिसरात असलेल्या २०० इमारतींमध्ये राहणाऱ्या ३५ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लागले आहेत.

    जुहू परिसरात मिलिटरी रडार असल्याचा फटका इथे राहणाऱ्या नागरिकांना बसतो. गेल्या ३५ वर्षांपासून इथल्या २०० धोकादायक इमारती आणि २ झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडला आहे. नागरिकांचं पुनर्वसन होऊ शकत नसल्यानं मोठी समस्या निर्माण झाली आहे. इथले ३५ हजार नागरिक जीव मुठीत राहत आहेत. आमच्या समस्यांकडे पाहायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही. मग आम्ही मतदान का करायचं, असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत.
    Maharashtra Timesमी मुंबईत येतोय, माझे पाय…; राज ठाकरेंना भाजपच्या अण्णामलाई यांचं ओपन चॅलेंज, वाद पेटणार
    परिसरातील २०० इमारती आणि २ झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या समस्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. या संदर्भात बराच पाठपुरावादेखील केला. पण हाती काहीच ठोस लागलेलं नाही. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे बॅनर परिसरात लागलेले आहे. त्यावर जुहू वाचवा, मध्यम वर्ग आणि गरीब कुटुंबांना वाचवा, असा उल्लेख आहे.

    SRO150 कायदा कालबाह्य असून त्यामुळे घरं उद्ध्वस्त होत आहेत. १९३९ च्या ब्रिटिश कायद्याच्या अंतर्गत आम्हाला आमच्या घरांमधून हाकलण्यात आलं आहे. २०० इमारती आणि २ झोपडपट्ट्या धोक्यात आल्या आहेत. इथल्या ३५ हजार नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी घराबाहेर पडण्यासाठी पाऊल टाकण्याआधी १०० वेळा विचार करा, असं आवाहन स्थानिकांना करण्यात आलं आहे.
    Maharashtra Timesभाजप-MIMचे सूर पुनश्च जळले, युतीचे धागे पुन्हा विणले; पाच जणांचा पाठिंबा अन् गेम झाला
    २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळीही इथल्या नागरिकांनी त्यांचं गाऱ्हाणं मांडलं. निवडणुकीनंतर तोडगा काढू, असं आश्वासन त्यांना देण्यात आलं. पण निवडणुका होऊन वर्ष उलटलं तरीही समस्या कायम आहे. त्यामुळे स्थानिकांनी पालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानावर बहिष्कार टाका, असं आवाहन करणारे बॅनर जुहूमध्ये अनेक ठिकाणी लागले आहेत.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा