राज ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री हिंदू आहे का?’ हा प्रश्न उपस्थित करत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज आणि उद्धव ठाकरे विकासाऐवजी भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, त्यांच्या प्रचाराची दिशा चुकत असल्याचे बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे पुढे म्हणाले की, आपण राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याइतका मोठा नेता नसल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, “मी फार लहान माणूस आहे, त्यामुळे त्यांना सल्ला देणार नाही. मात्र त्यांच्या पक्षांची ताकद किंचित होत चालली आहे. प्रचाराची चुकीची दिशा आणि चुकीचे निर्णय यामुळेच त्यांची अधोगती होत आहे.” प्रत्येक निवडणुकीत मुंबई तोडण्याची भाषा केली जाते, पण आता अशी वक्तव्ये गांभीर्याने घेतली जाणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्षे जनतेने दोघांनाही सत्तेत पाहिले आहे. त्या अनुभवावर अधिक भाष्य न केलेलेच बरे. “सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक विकासावर बोलू शकत नाहीत. विकासासाठी जन्मापासून जनतेच्या सेवेत आयुष्य घालवावे लागते,” असा घणाघात त्यांनी केला. तर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केली त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र आणि मुंबई कुठे जात आहे याची दिशा कळत नाही. आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची काय बरोबरी करेल हे मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहे का..? आदित्य ठाकरेंना तरी मान्य आहे का..? काहीतरी पोकळ गोष्टी करून लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ही बावनकुळे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरही बावनकुळे यांनी टीका केली. काँग्रेस पक्ष कायमच या योजनेच्या विरोधात राहिला असून, ज्या राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे तिथे ही योजना बंद करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयात जाऊनही काँग्रेसला अपयश आले असून, मकर संक्रांतीला लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असतानाही विरोध सुरू असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या प्रचाराबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील. याच विकासाच्या जोरावर भाजपला मते मिळतील. विदर्भात सर्वत्र भाजपला यश मिळेल, तर मुंबईतही देवेंद्र फडणवीस आणि विकास हेच प्रमुख मुद्दे असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
