• Fri. Mar 6th, 2026
    Dhananjay Munde: धनंजय मुंडे कमळ हाती घेणार? ३ घटनांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पण…

    मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे मागील काही महिन्यांपासून विविध घटनांमुळे चर्चेत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुंडेंना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांचा राजकीय आलेखही खालावत गेला. राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी पक्षाच्या प्रमुख कार्यक्रमांपासून ते दूर राहत असल्याचं चित्र आहे. अशातच मागील काही दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे आणि त्याला कारण ठरल्या आहेत तीन महत्त्वाच्या घटना. कोणत्या आहेत या घटना आणि मुंडेंच्या भाजप प्रवेशाची का चर्चा होतेय, हे आपण जाणून घेणार आहोत.

    पहिली घटना

    धनंजय मुंडे यांची अमित शहांसोबत भेट

    धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली इथं भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात माझा कसलाही सहभाग आढळला नसल्याचं सांगत मला मंत्रिमंडळात पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी या भेटीत धनंजय मुंडे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याची चर्चा रंगली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवार हे काम पाहत असताना मुंडे यांनी थेट भाजपच्या वरिष्ठांची भेट घेतल्याने त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, याबाबत तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. राष्ट्रवादीकडून मंत्रिपद काढून घेण्याच्या निमित्ताने राजकीय खच्चीकरण झाल्याने धनंजय मुंडे वेगळ्या राजकीय पर्यायावर विचार करत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    दुसरी घटना

    अजित पवारांच्या अनेक कार्यक्रमांना अनुपस्थित

    धनंजय मुंडेंनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून बीड जिल्ह्यात पक्षाचे ते प्रमुख नेते होते. त्यामुळे जेव्हा कधी अजित पवार हे बीड दौऱ्यावर येत असत तेव्हा त्यांच्यासोबत धनंजय मुंडे दिसणार नाहीत, असं होत नसे. मात्र अलीकडच्या काळात हे समीकरण काहीसं बदललं आहे. मागील काही महिन्यांत अजित पवार यांच्या अनेक जाहीर सभांना आणि इतर कार्यक्रमांना धनंजय मुंडे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे हेदेखील पाहायला मिळाले. मात्र कौटुंबिक कारण देत धनंजय मुंडे मात्र या दौऱ्यापासून लांब राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्यात आणि अजित पवारांच्यात अंतर वाढलं आहे का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    तिसरी घटना

    फडणवीसांसोबत स्टेज शेअर आणि हेलिकॉप्टर प्रवास

    संत वामनभाऊ यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र गहिनीनाथगड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित होते. मात्र यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी माझे मित्र असं म्हणत धनंजय मुंडे यांचा केलेला उल्लेख चर्चा विषय ठरला. तसंच या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने एकत्रित प्रवासही केला. त्यामुळे एकीकडे अजित पवारांच्या कार्यक्रमांपासून काहीसे दूर राहिलेले धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळ जात आहेत का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

    लगेच पक्षांतर होणं अशक्य?

    एकीकडे धनंजय मुंडे यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढताना दिसत असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत असली तरी हा प्रवेश होणं, तितकसं सोपंही नाही. कारण धनंजय मुंडे हे विधानसभेला राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आमदारकीची टर्म संपण्याआधी त्यांना पक्षांतर करायचे असल्यास आधी त्यांना आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत ते पोटनिवडणुकीची रिस्क घेतील की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे त्यांना घड्याळ सोडून हाती कमळ घ्यायचे असल्यास योग्य टायमिंगची वाट पाहावी लागणार, हे निश्चित आहे.

    दरम्यान, धनंजय मुंडे यांनी अद्याप उघडपणे भाजप प्रवेशाचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मात्र आता पक्षांतराच्या चर्चा रंगू लागल्यानंतर त्यांच्याकडून काय खुलासा केला जातो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *