• Sat. Mar 7th, 2026
    Mahayuti Manifesto: 35 लाख घरं, अर्ध्या तिकीटात प्रवास ते मोफत…, सत्ताधारी महायुती मुंबईकरांना काय-काय देणार? वाचा वचननाम्यातल्या मोठ्या घोषणा

    मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महासंग्रामासाठी महायुतीने आपला महत्त्वाकांक्षी ‘वचननामा’ प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज रविवारी हा जाहीरनामा मांडण्यात आला. भ्रष्टाचारमुक्त पालिका आणि जागतिक दर्जाची मुंबई, असे सूत्र मांडत महायुतीने मुंबईकरांच्या खिशाला दिलासा देणाऱ्या अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

    १. गृहनिर्माण आणि मराठी अस्मिता

    ३५ लाख घरांची निर्मिती: मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा शहरात हक्काचे घर मिळावे यासाठी पुढील ५ वर्षांत ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.पागडीमुक्त मुंबई: मुंबईतील जुन्या इमारतींमधील अनेक दशकांपासून सुरू असलेली ‘पागडी’ पद्धत बंद करून, तिथल्या भाडेकरूंना मालकी हक्काची घरे दिली जातील.

    रखडलेल्या २० हजार इमारतींना OC: तांत्रिक कारणांमुळे ज्या २० हजार इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र (OC) रखडले आहे, त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देऊन रहिवाशांना दिलासा दिला जाईल.

    सफाई कामगार व पोलिसांसाठी घरे: पालिकेचे सफाई कामगार आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या पुनर्विकासाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

    Uddhav Thackeray : ‘खरा मित्र तोच जो चुका दाखवतो’; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल मोठं विधान

    २. पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास

    खड्डेमुक्त मुंबई व यूटिलिटी टनेल: ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जातील. वारंवार होणारी रस्ते खोदाई थांबवण्यासाठी १७ विविध नागरी सेवांसाठी जमिनीखाली ‘यूटिलिटी टनेल’ (Utility Tunnel) उभारले जातील.

    पूरमुक्त मुंबई: जपानच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञान आणि IIT च्या मार्गदर्शनाखाली मुंबईला पुढील ५ वर्षांत पूर्णपणे पूरमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

    ३. वाहतूक आणि बेस्टचा विस्तार

    महिलांना बस प्रवासात ५०% सवलत: महिलांच्या प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी ‘बेस्ट’ बस भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.

    इलेक्ट्रिक बसेसचा ताफा: २०२९ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १०,००० नव्या इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

    ४. आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा

    मोफत आरोग्य तपासणी: ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना पालिकेच्या रुग्णालयांत वर्षातून एकदा मोफत ‘फुल बॉडी चेकअप’ची सुविधा दिली जाईल.

    आपला दवाखाना सक्षमीकरण: प्रत्येक वॉर्डमधील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रांमध्ये ३०-४० प्रकारच्या चाचण्या आणि औषधे मोफत मिळतील.

    वैद्यकीय विद्यापीठ:
    महापालिकेच्या रुग्णालयांना जोडून ‘बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ’ स्थापन केले जाईल.

    ५. पारदर्शकता आणि सुरक्षा

    घुसखोरमुक्त मुंबई: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना मुंबईतून बाहेर काढण्यासाठी विशेष अभियान राबवले जाईल.

    भ्रष्टाचारमुक्त पालिकेसाठी AI: कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि कंत्राटदारांचे कडक पोलीस व्हेरीफिकेशन बंधनकारक असेल.

    ६. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम

    मराठी भाषा विभाग: पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केला जाईल. तसेच मराठी तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी नवीन धोरण राबवले जाईल.

    हुतात्मा स्मारक संग्रहालय: संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृतीसाठी जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येईल.

    स्वच्छता: झोपडपट्टी भागासाठी ‘मागेल त्याला शौचालय’ हे धोरण राबवून सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला जाईल.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed