• Mon. Mar 16th, 2026

    Eknath Shinde: दत्तक घेणाऱ्यांनी काय केले? नाशकात एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी, ठाकरे बंधूंसह फडणवीसांवर निशाणा

    Eknath Shinde: दत्तक घेणाऱ्यांनी काय केले? नाशकात एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी, ठाकरे बंधूंसह फडणवीसांवर निशाणा

    Eknath Shinde In Nashik: नाशकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधुंना सुनावलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, नाशिक: “ज्याच्या पाठीशी महिला, त्याचा नंबर पहिला,” असा नारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नाशिकमध्ये विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत तुफान फटकेबाजी केली. नाशिकला दत्तक घेणाऱ्यांनी आत्तापर्यंत काय केले असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. नाशिकच्या तपोवन भूमीत आयोजित जाहीर सभेत शिंदे यांनी विकासाचा अजेंडा मांडतानाच विरोधकांचे ‘टांगा पलटी अन् घोडे फरार’ करण्याचे आवाहन जनतेला केले.

    ‘नेटफ्लिक्स’वाल्यांना निवडणुकीतच जाग येते

    उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावताना शिंदे म्हणाले की, “काही लोक दिवसभर घरात बसून नेटफ्लिक्स बघतात आणि निवडणूक आली की पावसाळ्यातील छत्र्यांसारखे बाहेर येतात. ज्यांना फक्त तिजोरीत इंटरेस्ट आहे, नाशिकमध्ये त्यांनी काम काहीच केले नाही. आम्ही स्थगिती देणारे नाही, तर विकासाला गती देणारे लोक आहोत.”
    Maharashtra TimesUddhav Thackeray: भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, चुनावी हिंदुत्व अन् रावणाचा पक्षप्रवेश; उद्धव ठाकरे भाजपवर तुटून पडले

    कुंभमेळ्यावरून टोला, 20 वर्षांनी येणाऱ्यांना भविष्याची चिंता

    नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “काल कुंभमेळा भरला होता. 20 वर्षांनी जे आले होते, त्यांना आता 30 वर्षांनंतर काय होणार याची चिंता सतावत आहे. पण नाशिकची जनता सुज्ञ आहे. ही आजची प्रचार सभा नसून विजयाची सभा आहे.

    ‘लाडकी बहीण’ योजनेवरून विरोधकांना टोला

    “लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना राज्यातील महिलांनी जोडा दाखवला आहे,” अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. नाशिक हे जगाच्या नकाशावर महत्त्वाचे शहर होईल आणि आगामी कुंभमेळा हा ऐतिहासिक तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.हे प्रभू श्रीरामाचे नाशिक आहे आणि रामाचे निशाण धनुष्यबाण आहे. जो राम का नाही, तो काम का नाही. त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करा,” असे आवाहन शिंदेंनी भाषणाच्या शेवटी केले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा