• Sat. Mar 7th, 2026

    Devendra Fadnavis: जन्म नव्हे, कर्म महत्त्वाचे! ठाकरे बंधूंच्या ‘मुंबई बाहेरील’ टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर

    Devendra Fadnavis: जन्म नव्हे, कर्म महत्त्वाचे! ठाकरे बंधूंच्या ‘मुंबई बाहेरील’ टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर

    मुंबई : मुंबईच्या समस्या समजण्यासाठी या शहरातच जन्म घ्यायला हवा, असे कुठे आहे. मुंबईची अचूक नस पकडणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म मुंबईतील नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळावी, यासाठी लढा उभारणारे प्रबोधनकार ठाकरे यांचाही जन्म मुंबईचा नाही. त्यामुळे जन्म कुठे झाला, यापेक्षाही मुंबईसाठी काय योगदान दिले, हे महत्त्वाचे आहे. गेली ३५ वर्षे मुंबई ही माझी कर्मभूमी असून या शहराच्या विकासात माझेही योगदान आहे,’ अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ठाकरे बंधूंच्या आरोपांना उत्तर दिले.

    ‘ठाकरे बंधूंची युती राजकीय अपरिहार्यतेतून झाली,’ असा दावाही त्यांनी केली. ‘मुंबई महापालिकेतील प्रशासककाळात सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला,’ आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपालाही फडणवीस यांनी उत्तर दिले.
    भाजप कार्यकर्त्यांनी 50 खोक्यांवरुन डिवचले, शिवसैनिक संतापले; AB फॉर्म काढला, भाजप उमेदवाराची गोची
    ‘उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे पुराव्यानिशी केले आहेत. ठाकरे यांच्या कार्यकाळात मिठी नदीचा गाळ काढण्यापासून शहरातील कचरा उचलण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. मी कधीही हवेत आरोप करत नाही, तर सबळ पुरावेही दिले आहेत. मुंबईमध्ये त्यांच्या काळातील जवळपास २०० रस्त्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये या सर्व रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचे आढळले. घनकचऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकऐवजी स्कूटर निघाल्या. त्यामुळेच या आरोपांची चौकशी सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरात प्रत्येक कामासाठी जवळपास १५ ते १६ कंपन्यांच्या निविदा आल्या आहेत. या सर्व निविदा या कमी दराने आल्या आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

    पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही त्याच भाषेत उत्तरे दिली जात असल्याकडे लक्ष वेधले असता, ‘मी केवळ विकासावर बोलतो. मात्र अनेकदा विरोधकांकडून निरर्थक मुद्दे मांडल्यावर त्याला पक्षातील नेत्यांनाही प्रत्युत्तर द्यावे लागते, पण वादग्रस्त मुद्द्यांवर बोलण्याऐवजी विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक लढवली पाहिजे,’ असे फडणवीस यांनी अधोरेखित केले. ‘भाजपप्रणित महायुतीने मुंबईचा झपाट्याने विकास केला असून ही गती कायम राहावी, यासाठी महापालिकेतही आमचीच सत्ता यायला हवी,’ असेही फडणवीस यांनी नमूद केले.
    Maharashtra Times50 खोके, सॉरी सॉरी; 11 खोके, एकदम ओक्के! शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर भाजपची जोरदार घोषणा
    महायुतीच्या दबावामुळे राज्यात उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याच्या आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ‘आमच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी, आमचे नगरसेवक कसे बिनविरोध निवडून येत नाहीत, असा प्रश्न केला. याचा अर्थ ठाकरे यांचे नगरसेवक निवडून आले की, लोकशाही निरोगी असते आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध आले की, तो दबाव असतो, हा दुटप्पीपणा आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

    ‘आजवर ३५ खासदार बिनविरोध निवडून आले असून त्यात काही अपक्षही आहेत,’ याकडेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना लक्ष वेधले.

    शिंदेंकडेच बाळासाहेबांचा वारसा
    मुंबईत शिवसेनेसोबत युती का करण्यात आली, असा प्रश्न विचारला असता, ‘शिवसेनेला सोबत घेणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले. ‘बाळासाहेबांचा राजकीय वारसा एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेनेला बाजूला ठेवून लढणे योग्य नव्हते. शिंदे यांच्या पाठीमागे शिवसैनिक ठामपणे उभा आहे. त्यामुळे भाजप- शिवसेना युती ही दोघांनाही फायदेशीर आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

    अजित पवार हे ‘वास्तववादी’ नेते
    अजित पवार यांच्याशी काही ठिकाणी युती, तर काही ठिकाणी स्पर्धा आहे. प्रचारादरम्यान एकमेकांवर सडकून टीकाही होत असली, तरी अजित पवार हे अतिशय वास्तववादी नेते आहेत,’ असे फडणवीस यांनी अधोरेखित केले. ‘राजकारणात कधी, कुठे पाऊल पुढे टाकावे आणि कधी पाऊल मागे घ्यावे, हे ते जाणतात. त्यामुळेच त्यांच्याशी विचारपूर्वक युती केली आहे. पुढील चार वर्षे व त्यानंतरही ती कायम राहील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    Maharashtra TimesGanesh Naik: ‘शिंदेंच्या सेनेसोबत युती नकोच होती’, भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
    विविध विकास प्रकल्पांचे नियोजन
    फडणवीस यांनी यावेळी विविध योजना, प्रकल्प याबाबतच्या नियोजनावरही भाष्य केले. ‘मुंबईत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहत आहेत. भविष्यात समुद्रात दूषित पाणी सोडले जाणार नाही,’ अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. ‘सागरी किनारी मार्गाचे विस्तारीकरण, पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा रस्ता, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा, पूर्व मुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंतच विस्तार असे विकास प्रकल्प महायुती सरकारने हाती घेतले आहेत. तसेच, वरळी-शिवडी उड्डाणपूल डिसेंबर २०२६पर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

    बिनविरोध निवडणुका या कल्याण-डोंबिवली महापालिका आणि काही ठिकाणीच झालेल्या आहेत. आमचा दबाव असता, तर मुंबईतही बिनविरोध नगरसेवक निवडून आले असते. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed