• Sun. Mar 8th, 2026
    Jaydeep Kawade : ‘रामकृष्ण हरी, निलेश लंके यांना बसवा घरी’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेत कवाडेंची फटकेबाजी

    अहिल्यानगरमधील महायुतीच्या सभेत जयदीप कवाडेंचा खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्लाबोल, सुजय विखेंचे कौतुक करत…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अहिल्यानगरचे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. महायुतीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर विखारी शब्दांत हल्लाबोल केला. “अहिल्यानगरचे खासदार कोण आहेत, हे पाहीलं तर ते ग्रामपंचायतीचे सदस्यही वाटत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी लंके यांचा एकेरी उल्लेख करत उपरोधिक टोला लगावला.

    ‘रामकृष्ण हरी’ म्हणत निवडणुकीचे रणशिंग

    विरोधकांकडून सभांमध्ये होणाऱ्या ‘रामकृष्ण हरी’ या जयघोषाचा समाचार घेताना जयदीप कवाडे म्हणाले की, शरद पवार गटातील नेते सभांमध्ये हात वर करून घोषणाबाजी करतात. मात्र, आता वेळ आली आहे की नगरकरांनी ‘रामकृष्ण हरी, निलेश लंकेला बसवा घरी’ अशीच घोषणा दिली पाहिजे. त्यांच्या या विधानाने सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

    सुजय विखेंचे कौतुक, लंकेंवर निशाणा

    कवाडे यांनी आपल्या भाषणात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची पाठराखण केली. “नगरकरांच्या कोणत्याही कामासाठी जनता आजही मनातील खासदार म्हणून डॉ. सुजय विखे यांच्याकडेच जाते. सुजय दादा जनतेची कामे तत्परतेने पूर्ण करून दाखवतात,” असे सांगत त्यांनी विखेंच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

    Maharashtra TimesPrakash Ambedkar: ‘महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला लागलाय!’; प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात, दोन्ही पवारांवरही डागली तोफ

    तर दुसरीकडे, विद्यमान खासदारांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना निवडून देणे ही नगरकरांची चूक असल्याचे सूचक विधान त्यांनी केले.

    ‘सुजय दादा असल्यामुळे डोन्ट वरी’

    निवडणुकीच्या या रणधुमाळीत कवाडे यांनी एक नवी घोषणाच देऊन टाकली. “रामकृष्ण हरी, सुजय दादा असल्यामुळे डोन्ट वरी,” असे म्हणत त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. निवडणुकीच्या तोंडावर खासदारांवर थेट वैयक्तिक स्वरूपाची टीका झाल्याने आता शरद पवार गट आणि निलेश लंके समर्थक याला काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    या सभेतील कवाडेंच्या आक्रमक भाषणामुळे अहिल्यानगरमधील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता अधिकच टोकदार झाला असून, निवडणुकीचे मैदान ‘हाय-व्होल्टेज’ झाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा