Mumbai News: मुंबईत वांद्रे रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयादरम्यान एक महत्वाचा स्कायवॉक तयार केला जात आहे. या स्कायवॉकचे काम पूर्ण झालं असलं तरी एका कारणामुळे याचं उद्घाटन रखडलं आहे. नेमकं कारण काय, जाणून घ्या….
उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार डिसेंबरअखेर हा स्कायवॉक नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने कोणतेही उद्घाटन किंवा लोकार्पण करता येत नाही आहे. या गोष्टीचा फटका या लोकोपयोगी प्रकल्पाला बसला आहे. परिणामी, पूर्णत्वास गेलेला स्कायवॉक लोकार्पणाअभावी बंदच आहे.
नागरिकांची मोठी वर्दळ
वांद्रे पूर्व व बीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणावर सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कार्यालये आहेत. म्हाडा, एसआरए यांसारख्या महत्त्वाच्या कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांची दररोज मोठी वर्दळ असते. स्कायवॉक नसल्यामुळे नागरिकांना अरुंद व धोकादायक फूटपाथवरूनच चालावे लागत असून, यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. स्कायवॉक खुला झाल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Mumbai Metro: तीन महिने उलटूनही भुयारी मेट्रोमध्ये ‘नो नेटवर्क’, खरं कारण आलं समोर; ‘या’ कंपनीच्या मनमानीमुळे प्रवाशांचे हाल
एमएमआरडीएने 2008-09 मध्ये गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा स्कायवॉक उभारला होता आणि नंतर तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. कालांतराने स्कायवॉक असुरक्षित झाल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने त्याच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला. मात्र कामाला विलंब झाल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाचे कठोर आदेश
न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेला स्कायवॉक ठरावीक कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. सुरुवातीला 15 महिन्यांची मुदत देण्यात आली होती; मात्र ती न पाळल्याने न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओढत दहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि मार्च 2024 मध्ये याचिका निकाली काढली. अखेर स्कायवॉकचे काम पूर्ण झाले असले तरी आता उद्घाटनाचा अडसर उभा राहिला आहे.
Versova-Bandra Sea Link: 100 वर्ष टिकणार मुंबईतील हा सागरी सेतू, 120 मिनिटांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत; कुठे-कसा बांधणार?
नियमांनुसार आचारसंहितेच्या काळात उद्घाटन करता येत नसले, तरी लोकोपयोगी प्रकल्प कोणत्याही औपचारिक कार्यक्रमाविना खुला करता येतो, असे मत व्यक्त केले जात आहे. मात्र प्रशासनाकडून तसा निर्णय न झाल्याने निवडणूक निकालानंतरच स्कायवॉक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे “काम पूर्ण असेल तर स्कायवॉक तातडीने खुला करावा,” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
