• Fri. Mar 6th, 2026

    Navi Mumbai Airport: विमानतळामुळे महामार्गांचाही होतोय कायापालट; तीन उड्डाणपूलांमुळे प्रवास सुलभ, कुठून-कुठे जोडणार?

    Navi Mumbai Airport: विमानतळामुळे महामार्गांचाही होतोय कायापालट; तीन उड्डाणपूलांमुळे प्रवास सुलभ, कुठून-कुठे जोडणार?

    Thane Belapur Road: नवी मुंबई विमानतळावर उड्डाणांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे विमानतळाच्या दिशेने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक वाढणार आहे. यामुळेच ठाणे-बेलापूर मार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, नवी मुंबई: नवी मुंबई ते ठाणे जोडणारा ठाणे-बेलापूर मार्ग लवकरच पूर्णपणे बदललेल्या स्वरूपात दिसणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित आहे. ही वाढ लक्षात घेऊन या महत्त्वाच्या महामार्गाच्या नूतनीकरणासह तीन नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी सुमारे 544 कोटी रुपयांचा भरीव खर्च केला जाणार आहे. त्यामुळे ठाणे–बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

    तुर्भे येथे काम सुरू

    सध्या ठाणे–बेलापूर मार्गावर तुर्भे येथे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच क्रिस्टल हाऊस ते पावणे, बीएसएफ कंपनी ते युंदाई शोरूम आणि रबाळे जंक्शन या तीन ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. हे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर सिग्नलवरील थांबे कमी होणार असून प्रवाह सुलभ होईल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या ‘हॅम्प’ योजनेतून निधी मिळणार आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे 227 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.Maharashtra TimesAiroli-Katai Naka Freeway: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास 15 मिनिटांत; भुयारी बोगदा, खाडीवरून रस्ता, मार्ग 80% पूर्ण, कधी होणार सुरू?

    कुठून-कुठे जोडणार?

    ठाणे-बेलापूर मार्ग हा मुंबई, ठाणे, पुणे, ऐरोली, न्हावा शेवा तसेच दक्षिण भारताकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गालगत मोठी औद्योगिक व आयटी क्षेत्रे असल्याने दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर, विविध उद्योग, परकीय गुंतवणूक तसेच रहिवासी आणि वाणिज्य संकुलांची उभारणी सुरू आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे–बेलापूर मार्गाचा कायापालट करणे अपरिहार्य बनले होते.

    सध्या ठाणे–बेलापूर आणि शीव–पनवेल हे दोन महामार्ग वाहतूक कोंडीसाठी ओळखले जातात. दररोज पीक अवर्समध्ये वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचल्याने परिस्थिती आणखी गंभीर होते. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन महापालिकेने हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करून आधुनिक पद्धतीने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

    Maharashtra TimesWestern Railway: नवीन वर्षात मुंबईतील रेल्वे प्रवाशांना खास भेट, राजधानी- शताब्दीला मिळणार अतिरिक्त AC कोच; किती नवे डबे जोडणार?

    नवी मुंबई महानगरपालिका शहर गतिशील योजना अंतर्गत हे काम राबवणार असून, या प्रकल्पामुळे मीरा–भाईंदर–ठाणे ते पनवेल–उरण आंतरराष्ट्रीय विमानतळ असा संपूर्ण प्रवास अधिक जलद होईल. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितले की, या रस्त्याच्या नूतनीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुसह्य होईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा