• Sat. Mar 7th, 2026
    बायको फेसबुक लाईव्हमध्येच किंचाळली, रीलस्टार नवऱ्याचा करुण अंत, तीन चिमुकलींचं पितृछत्र हरपलं, महाराष्ट्र हळहळला

    Beed Reel Star Ganesh Dongare Death : ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात रील स्टार गणेश डोंगरे यांच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावरुन गेल्यामुळे ऊसतोड कामगार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात कुटुंबप्रमुखाचा जागीच मृत्यू झाला. मयत गणेश डोंगरे हा रील्सस्टारही होता. दुर्दैव म्हणजे गणेशची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच तिच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला.

    बीड जिल्ह्याची ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून एक वेगळी ओळख आहे. उसाच्या हंगामात येथील लाखो जोडपी ऊस तोडणीसाठी राज्यासह इतरत्र जात असतात. बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोन्नाखोटा या ठिकाणचा रहिवासी असलेला गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी हे देखील पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते.

    मेहनतीच्या घामातून कुटुंबाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे वडवणी तालुक्यातील डोंगरयाची वाडी येथील डोंगरे कुटुंब आपल्या चिमुकल्या तीन लेकरांसह ऊस तोडणीसाठी गेलं होतं. ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात गणेश डोंगरे यांच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या लेकरावर दुर्दैवी वेळ ओढवली आहे. या घटनेमुळे वडवणी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोकाकळा पसरली आहे.

    कोण होते गणेश डोंगरे?

    वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील गणेश डोंगरे यांच्याकडे केवळ एक एकर जमीन होती. आई वडील भोळसर असल्यामुळे गणेश यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. पत्नी अश्विनी अत्यंत गुणवान आणि कष्टाळू. दोघांना तीन मुली झाल्या. तीन मुलींचे पालनपोषण, आई-वडिलांची जबाबदारी त्यामुळे वाढलेला खर्च गावाकडे राहून भागत नव्हता. गावाकडील पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला नाजूक आर्थिक परिस्थितीशी झुंज द्यावी लागत होती. त्यामुळे आपल्या कुटुंबातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी गणेश आणि अश्विनी यांनी मुंगळा ट्रॅक्टरद्वारे ऊस तोडणी सुरू केली.
    Maharashtra TimesNashik Crime : प्रेम प्रकरणातून 23 वर्षीय तरुणाचा जीव घेतला, काका-पुतण्याला अटक, रवीचे युवतीसोबत…

    कसा झाला अपघात?

    मागील काही वर्षांपासून ही जोडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ऊस तोडणी करत होती. यावर्षी लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर हे दाम्पत्य चिमुकल्या लेकरांसह ऊस तोडणी करत होते. शनिवारी दुपारच्या वेळेला आपला ट्रॅक्टर भरून ते साखर कारखान्यावर माप होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. त्याचवेळी एक ट्रॅक्टर जवळून जात असताना गणेश यांच्या अंगावर कोसळला. त्यात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक जण जखमी झाला. अश्विनीच्या डोळ्यासमोर काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

    फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच ही घटना घडल्यामुळे अश्विनीवर आभाळ कोसळलं. गणेशच्या मृत्यूची खबर काही क्षणात सोशल मीडियातून बीड जिल्ह्यात पोचली. संपूर्ण बीड जिल्हा अक्षरशः हळहळला.

    हसतं-खेळतं कुटुंब क्षणात संपलं

    अश्विनी आणि गणेश डोंगरे हे दाम्पत्य रीलस्टार होतं. ऊस तोडणी करून जगताना मोठ्या आनंदाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आलेल्या परिस्थितीशी ते तोंड देत होते. गणेशचा अपघात झाला त्यावेळी अश्विनी सोशल मीडियावर लाईव्ह होती. लाईव्ह असतानाच ही ट्रॉली गणेशच्या अंगावर पडली. एक हसतं-खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं.
    Maharashtra TimesNikitha Godishala : भारतीय तरुणीला अमेरिकेत संपवलं, एक्स बॉयफ्रेण्ड भारतात पळाला, अर्जुनच्या घरात निकितासोबत काय घडलं?

    25 लाखाची आर्थिक मदत द्यावी

    ‘लातूर जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यावर हा अपघात झाला तो केवळ साखर कारखान्याच्या चुकीमुळे झाला आहे. ज्या ठिकाणी वाहने उभे राहतात त्या ठिकाणी व्यवस्थित रस्ता नाही. त्यामुळे हा अपघात कारखान्याच्या चुकीमुळे झाला आहे. विशेष म्हणजे कारखान्यावर वेळेवर माप होत नव्हते आणि माप न झाल्यामुळे गणेशला आपले वाहन मापाच्या प्रतीक्षेत उभे करून थांबावं लागलं होतं. त्यामुळे अपघाताची जबाबदारी स्वीकारून साखर कारखान्याने गणेशच्या तीन लेकरं, पत्नी आई-वडिलांसाठी किमान 25 लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी व त्यांच्या पालनपोषणाची, शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावी’ अशी मागणी केली जात आहे.

    इथे क्लिक करुन पाहा व्हिडिओ :

    लातूर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ठिकाणचा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार चालवतात अशी माहिती आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील पालकत्व असलेल्या अजित दादांनी एका ऊसतोड मजुराच्या मृत्यूनंतर तीन चिमुकल्या बालकांसह त्याची पत्नी आणि आई वडील या परिवाराचे पालकत्व स्वीकारावं आणि या कुटुंबाला घर बांधकाम करुन द्यावं, तसेच लेकरांना आधार द्यावा अशा पद्धतीची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.

    BMC Election 2026 | मुंबई महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार? दादरकरांना काय वाटतं?

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा