• Wed. Mar 11th, 2026
    Raigad Crime: काळोखे हत्या प्रकरणात राजकीय सुपारीचा बॉम्ब; सत्ताधारी की विरोधक? हडपसरच्या गुंडाच्या कबुलीने रायगड हादरले!

    रायगड – अमुलकुमार जैन: रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे (वय ४५) यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात आता राजकीय सुपारीचा गंभीर आरोप समोर आल्याने तपासाला वेगळेच वळण मिळाले असून सुपारी देणारा नेता सत्ताधारी पक्षातील आहे की विरोधी पक्षातील, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    या हत्येप्रकरणातील पसार आरोपी खलील कुरेशी (वय २३, रा. सय्यद नगर, हडपसर) याला पुण्यातील हडपसर येथील हांडेवाडी परिसरातून वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली. या अटकेमुळे अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस चौकशीत खलील कुरेशी याने दोन साथीदारांच्या मदतीने मंगेश काळोखे यांचा खून केल्याची कबुली दिली असून हा खून करण्यासाठी एका राजकीय नेत्याने सुपारी दिल्याचा दावा केला आहे.

    वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी घडलेल्या एका सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उमरनूर खान आणि साहिल हबीब फकीर यांना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीतून खलील कुरेशी हा खोपोलीतील हत्या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खलीलचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीनुसार तो हांडेवाडी परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

    Nashik Accident: त्र्यंबकेश्वरमधल्या ‘त्या’ अपघाताचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; डंपरखाली चिरडून दोन तरुणांचा करुण अंत

    चौकशीत खलीलने मंगेश काळोखे यांची हत्या ही नियोजित कटाचा भाग असल्याचे सांगितले. या हत्येमागे आर्थिक व्यवहार असून सुपारी देणारा एक राजकीय नेता असल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. मात्र हा नेता कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, याबाबत त्याने स्पष्ट नाव घेतलेले नसून पोलीस त्याचा सखोल तपास करत आहेत.

    दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि पक्ष प्रवक्ते भरत भगत यांची नावे चर्चेत आली होती. मात्र रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सध्या या दोघांविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय नावं चर्चेत असली तरी अद्याप पुराव्यांचा अभाव असल्याचे चित्र आहे.

    या हत्येच्या नवव्या दिवशी मंगेश काळोखे यांच्या मुलींनाही मारण्याचा कट होता, असा धक्कादायक दावा त्यांच्या मुलीने केला होता. त्यामुळे या प्रकरणाची भीषणता अधिकच वाढली आहे. पोलिस तपासात ही हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

    या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट दिली असली तरी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही, यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी या प्रकरणासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप शासनाने एसआयटी स्थापन न केल्याने तपासावर संशय व्यक्त केला जात असून, राजकीय दबावामुळे तपास रखडतो आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. खोपोलीतील या हत्येप्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *