• Sat. Jun 6th, 2026
    Maharashtra Election: …तोपर्यंत गुलाल उधळून देऊ नका; बिनविरोध निवडून आलेल्यांची धाकधूक वाढली, आयोगाकडून कोणते नवे आदेश?

    Election Commission : अहवाल देण्यापूर्वी जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवाराच्या बिनविरोध निवडीबाबत प्रक्रिया पार पाडली असेल किंवा संबंधित उमेदवारास निवडून आल्याचं प्रमाणपत्र दिले असल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची धाकधूक वाढली, आयोगाकडून कोणते नवे आदेश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे 60 हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडून आलेल्या उमेदवारांबाबत राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल येईपर्यंत विजयी उमेदवार जाहीर करू नका, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

    ‘सन 2004 च्या राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी आदेशानुसार ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्याबाबतचा अहवाल आयोगाला सादर करावा लागतो. त्यानुसार संबंधित महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यात चौकशीचा प्रश्न नाही,’ असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शनिवारी सांगितले. ‘एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यापूर्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करावा लागतो. अहवाल देण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बिनविरोध निवडीबाबत प्रक्रिया पार पाडली किंवा संबंधित उमेदवाराला निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले असेल, तर नियमानुसार कारवाई केली जाईल,’ असं एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

    ‘बिनविरोध’विरोधात मनसे न्यायालयात जाणार

    राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबद्दल राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असतानाच याविरोधात आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्यायालयात जाणार आहे, असे पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी सांगितले.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेमंडळींची विशेष बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी ही माहिती दिली. तर ‘राज्यातील विविध महापालिकांमध्ये 60 हून अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. हा प्रकार वेळीच थांबला नाही, तर भविष्यात निवडणुकाच होणार नाहीत,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा