• Sat. Mar 7th, 2026
    Jalna Muncipal Election: पहिल्याच महापालिकेसाठी जालना सज्ज; राजकीय मैदान तापलं, भाजपचाही शंखनाद, किती जागा येणार? बड्या नेत्यानं आकड्यासह सगळ प्लॅनिंग सांगितलं…

    जालना: यंदा पहिल्यांदाच होणाऱ्या जालना महानगरपालिका निवडणुकीमुळे शहराचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. नव्याने स्थापन झालेल्या जालना महापालिकेत एकूण ७२ जागा असून, या निवडणुकीकडे राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका मांडत भाजपची रणनिती स्पष्ट केली.

    दानवे म्हणाले की, जालना महापालिका निवडणुकीत भाजप ४५ जागा जिंकणार असून कोणत्याही पक्षाच्या मदतीशिवाय स्वबळावर सत्ता स्थापन करेल. जालन्याची ही पहिलीच महापालिका निवडणूक असल्याने भाजप मोठ्या ताकदीने मैदानात उतरला असून पक्षाकडे नेत्यांची मजबूत फळी असल्याचा दावाही त्यांनी केला.

    भाजपच्या प्रचाराची सुरुवात उद्या जालन्यातील राम मंदिरात नारळ फोडून करण्यात येणार आहे. त्याच दिवशी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ५ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर ६ तारखेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जालन्यात प्रचारासाठी येणार असल्याचे दानवे यांनी जाहीर केले.

    Nagpur Crime: डॉक्टरांकडे नेले, मारले तरी ऐकत नव्हता; शेवटचा पर्याय म्हणून 12 वर्षीय मुलाला थेट… हताश आईची धक्कादायक कबुली

    विरोधकांवर टीका करताना दानवे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. “उद्धव ठाकरे स्वतः बिनविरोध निवडून आले होते, ते किती पैशांत निवडून आले हे आधी स्पष्ट करावे आणि मग आरोप करावेत,” असा टोला त्यांनी लगावला. मात्र, अजित पवार यांच्याविषयी बोलणे त्यांनी टाळले.

    निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या मुलाखती घेतात व त्या ‘सामना’मध्ये छापतात, असे सांगत “मेरी गवाही मेरे भाई को पूछो” असे म्हणत त्यांनी दोघांवरही उपरोधिक टीका केली. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर सातत्याने टीका करावी, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असे म्हणत दानवे यांनी जलील यांचीही खिल्ली उडवली.

    दरम्यान, भाजपमधील काही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे मान्य करत, ते अर्ज मागे न घेतल्यास संबंधितांवर पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

    पहिल्यांदाच होणाऱ्या या महापालिका निवडणुकीत जालन्याची सत्ता कुणाच्या हाती जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed