• Fri. Mar 13th, 2026

    शिंदेंच्या होमपीचवर भाजप सुस्साट; देवाभाऊंच्या शिलेदारानं करुन दाखवलं, मतदानाआधीच मोठा धमाका

    शिंदेंच्या होमपीचवर भाजप सुस्साट; देवाभाऊंच्या शिलेदारानं करुन दाखवलं, मतदानाआधीच मोठा धमाका

    KDMC Election 2026: कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. इथे भाजप, शिंदेसेनेची युती झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेना यांच्या महायुतीनं आतापर्यंत २० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एकूण नगरसेवकांचा आकडा १२२ आहे. त्यामुळे बहुमतासाठी ६२ जागा गरजेच्या आहेत. महायुतीनं मतदानाला १३ दिवस शिल्लक असताना २० जागा खिशात घातल्या आहेत. त्यामुळे आता महायुती विजयापासून ४२ जागा दूर आहे.

    कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना ६६, तर भाजप ५६ जागा लढवत आहे. गेल्या निवडणुकीच्या कामगिरीवर जागावाटप झालेलं आहे. या ठिकाणा विरोधकांची ताकद अगदीच क्षीण झालेली आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही होते. पण युतीचा निर्णय झाला. भाजपच्या वाट्याला कमी जागा आल्या.
    Maharashtra TimesNCPच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो; प्रश्न विचारताच अजितदादांचं मोजक्या शब्दांत सूचक उत्तर
    भाजप लढवत असलेल्या ५६ जागांपैकी १४ जागांवर पक्षानं विजय मिळवला आहे. त्यांचे उमेदवार बिनविरोध जिंकून आले आहेत. आतापर्यंत भाजपच्या रंजना पेणकर, आसावरी नवरे, मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, मुकुंद पेडणेकर, महेश पाटील, साई शेलार, दिपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉ. सुनीता पाटील, पूजा म्हात्रे, रवीना माळी असे १४ जण विजयी झाले आहेत. याचा अर्थ भाजपनं २५ टक्के जागा बिनविरोध जिंकलेल्या आहेत. साई शेलार सलग दुसऱ्यांदा बिनविरोध विजयी झाले आहेत.

    दुसरीकडे ६६ जागा लढवत असलेल्या शिंदेसेनेचे ६ जण बिनविरोध निवडून आले आहेत. शिंदेसेनेच्या रेश्मा निचळ, ज्योती मराठे, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल मोरे असे ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. बिनविरोध विजयी होण्यात शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट भाजपच्या तुलनेत कमी आहे.
    Maharashtra Timesहॅलो उद्धव! शिंदेंचा थेट कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; शिवसेनेच्या उमेदवाराचा जीव भांड्यात पडला
    कल्याण-डोंबिवली शहर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं होमग्राऊंड आहे. इथे स्वबळावर लढून सत्ता खेचून आणण्याची तयारी त्यांनी केली होती. शहरात भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे चव्हाण स्वबळावर लढण्यासाठी प्रचंड आग्रही आहे. पण वरुन युतीचा निर्णय झाला आणि भाजपमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळाली. पण भाजपनं २५ टक्के उमेदवार बिनविरोध निवडून आणत मतदानाच्या १३ दिवस आधीच धुरळा केला आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा