Maharashtra Elections: राज्यातील २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण ३३,६०६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. युती, आघाडी, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे.
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर मंगळवार, ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. २९ महापालिकांमधील ८९३ प्रभागांतील २ हजार ८६९ जागांसाठी एकूण ३३ हजार ६०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून बुधवारी देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी ३ हजार १७९ तर पनवेल महापालिकेच्या २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ३९१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यातील इतर महानगरपालिकांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वात कमी आहे.
Solapur News : याला म्हणतात ‘गेम’! मशालीचा एबी फॉर्म घेतला अन् भाजपमधून अर्ज दाखल केला
पुण्यात २,३९७ उमेदवार
महाविकास आघाडी, शिवसेना (शिंदे) तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकाच प्रभागात एकाहून अधिक दिलेल्या ‘एबी’ फॉर्ममुळे छाननी दरम्यान मोठा गोंधळ उडाला. याशिवाय अपूर्ण कागदपत्रे आणि अर्जातील गोंधळ लक्षात घेता १३१ अर्ज बाद झाले आहेत.
पुण्यात नऊ वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होत असून छाननीनंतर दोन हजार ३९७ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. यातील प्रमुख पक्षांकडून आपआपल्या उमेदवारांना फायदा होईल, अशा अपक्षांचे अर्ज मागे घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अर्ज माघारीसाठी दोन दिवसांचा कालावधी असल्याने या काळात प्रत्येक प्रभागातील राजकारण पाहता आडाखे बांधण्यात येत आहेत. त्यासाठी काही अर्ज मागे घेतले जातील, तर काही अर्ज जाणीवपूर्वक ठेवून निवडणूक लढवली जाईल.
झटपट पटापट! काल राष्ट्रवादीतून भाजपात, 24 तासांत नगरसेवकपद; निष्ठावंत राहिले बघत, अनोखा विक्रम
सहा उमेदवार बिनविरोध
भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात कल्याण-डोंबिवलीतील तीन, पनवेलमधील एक, तर धुळ्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवलीत रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर या तिघी, पनवेलमध्ये नितीन पाटील, तर धुळ्यात उज्ज्वला भोसले आणि ज्योत्स्ना पाटील या दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्या.
