• Sun. Mar 8th, 2026
    एक बैठक आणि फडणवीसांचा मोठा निर्णय, मुंबईत महायुतीच्या 12 उमेदवारांची माघार, कारण काय?

    Mumbai News : मुख्यमंत्र्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांना यासंदर्भातील निर्देश दिले असून, शिवसेना आणि भाजप त्यांच्या कोट्यातील १२ जागांवर उमेदवार मागे घेणार आहेत

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात डाववले गेल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने स्वबळाचा नारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नाराजी दूर केली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातील रिपाइंला हव्या असलेल्या १२ जागा त्यांच्यासाठी सोडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांना यासंदर्भातील निर्देश दिले असून, शिवसेना आणि भाजप त्यांच्या कोट्यातील १२ जागांवर उमेदवार मागे घेणार आहेत, असे आठवले यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजी दूर झाल्याचे जाहीर केले. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाने १७ जागांची अंतिम यादी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपविली. त्यातील किमान १२ जागा रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात येणार आहेत. अन्य जागांवर रिपब्लिकन पक्षासोबत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. मुंबई महापालिकेच्या उर्वरित १९७ जागांवर रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटकपक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे, असे आठवले यांनी जाहीर केले.

    मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोट्यातील सहा ते सात जागा रिपाइंसाठी सोडण्यास संमती देत, तसे निर्देश भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना दिले आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातील रिपाइंला हव्या असणाऱ्या सहा-सात जागा सोडण्यात येणार आहेत. त्याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे. उर्वरित १८ जागांवर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे.
    Maharashtra TimesAkshay Waghmare : अरुण गवळीच्या मुलीला प्रेमात कसं पाडलं? अभिनेता अक्षय वाघमारेचं दिलखुलास उत्तर, घरुन विरोध होता पण…
    भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून सहा-सहा अशा १२ जागा रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात येतील. त्या १२ जागांवर भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे १२ उमेदवार निवडणूक लढतील.
    Maharashtra TimesBMC Election : बालेकिल्ल्यातच ठाकरे बंधूंची कसोटी, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात बंडोबा, तर अमित ठाकरे ‘पडले’ तिथे चक्क…
    दरम्यान, मुंबईतील कुठल्या जागांवर महायुतीचे उमदेवार माघार घेणार आहेत, त्या प्रभागाची नावं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. संबंधित उमेदवारांची प्रतिक्रियाही महत्त्वाची ठरणार आहे.

    १५ वर्षांच्या निष्ठेला डावललं, भाजपमध्ये बंडखोरी, जान्हवी राणे अपक्ष लढून दाखवणार

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा