पुण्यात कुख्यात टोळी प्रमुखांच्या नातेवाईकांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या उमेदवारांना जनतेना नाकारते की स्वीकारते? ते पाहणं आता औत्सुक्याचं आहे.
तुरुंगातून लढवणार निवडणूक
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही महिला सध्या 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांना केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सशर्त परवानगी दिली होती, त्यानुसार 27 डिसेंबर रोजी त्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आता त्या तुरुंगातूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेने 15 नावं दिली पण भाजपने वाचून चर्चाच बंद केली, ‘त्या’ उमेदवारांची यादी मटा ऑनलाईनच्या हाती
टोळीयुद्धाची पार्श्वभूमी आणि राजकीय आश्रय
पुण्यातील गुन्हेगारीचा इतिहास पाहता आंदेकर आणि कुमकर टोळीतील संघर्ष सर्वश्रुत आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती, ज्याचा सूड म्हणून गोविंद उर्फ आयुष कुमकर याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी टोळीप्रमुख बंडू आंदेकरसह 13 जणांवर गुन्हे दाखल आहेत. अशातच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला राजकीय मुख्य प्रवाहात स्थान दिल्याने सामान्य पुणेकरांमधून संताप व्यक्त होत आहे.
गजा मारणेच्या पत्नीलाही तिकीट
केवळ आंदेकर कुटुंबच नव्हे, तर पुण्यातील आणखी एक कुख्यात नाव म्हणजे गजा मारणे. त्याच्या पत्नी जयश्री मारणे यांनाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. एका बाजूला गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या वल्गना करायच्या आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारीशी संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांना उमेदवारी द्यायची, या दुटप्पी धोरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
Pune Municipal Election : चंद्रकांत दादांना विधानसभेत नडणाऱ्या माजी नगरसेवकाचं भाजपने तिकीट कापलं, पण अमोल बालवडकरांनी गेम फिरवला
निवडणुकीत रंगात येणार गुन्हेगारी विरुद्ध नैतिकता?
बंडू आंदेकर यानेही अपक्ष किंवा इतर मार्गाने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, आंदेकर कुटुंबातील महिला सदस्यांना थेट पक्षाचे तिकीट मिळाल्याने पुण्याच्या राजकारणाचे ‘गुन्हेगारीकरण’ होत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. तुरुंगात राहून या उमेदवारांना प्रचाराचे कोणते नियम लागू होतात आणि मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
