हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर मिरा-भाईंदरमध्ये चर्चा सुरू आहे ती चोरीची. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास सुरू असून…..
निवडणुकीच्या रणधुमाळीत आध्यात्मिक मेळावा
मिरा-भाईंदरच्या हटकेश भागात २४ ते २८ डिसेंबर दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या भव्य प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, आध्यात्मिक माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला होता. या कार्यक्रमासाठी केवळ शहरच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.
बस स्टॉपवरच साधला डाव
कार्यक्रमाच्या सांगतेनंतर लगतच्या नवीन जीसीसी हॉटेल जवळील बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील चेन आणि इतर दागिन्यांवर डल्ला मारला. शुक्रवारपासून सलग तीन दिवस दागिन्यांच्या चोरीचे सत्र सुरू होते. धक्काबुक्की आणि गोंधळाचा फायदा घेत अज्ञात महिलांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
Raigad News: मंगेश काळोखे हत्याकांडात ‘बीड’ कनेक्शन! आमदार थोरवेंचा मास्टरमाईंडबाबत खळबळजनक आरोप
पोलिसांची ‘किंमत’ लावण्याची पद्धत चर्चेत
नागरिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी १३ संशयित महिलांना ताब्यात घेतले आहे. मात्र, एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना (सुमारे ८० हजार रुपये प्रति तोळा), पोलिसांनी १० ग्रॅम सोन्याची किंमत एफआयआरमध्ये अवघी २० हजार रुपये दर्शवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काशिगाव पोलिसांच्या माहितीनुसार, अद्याप अनेक भाविकांचे दागिने चोरीला गेल्याचा अंदाज असून तक्रारी येण्याचे सत्र सुरूच आहे. या घटनेमुळे आयोजकांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
