पिंपरी-चिंचवडमधील प्रकाश आंबेडकरांच्या एका राजकीय वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही पक्ष विरुद्ध पक्ष अशी नसून ‘गाववाले विरुद्ध बाहेरचे’ अशी असल्याचे थेट वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. १९७२ च्या दुष्काळानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले अनेकजण येथे स्थायिक झाले, मात्र त्यांना आजही ‘गाववाले’ मानले जात नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशीच होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
या वक्तव्याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे इशारा केला. अजित पवार हे बारामतीचे असून पिंपरी-चिंचवडचे नाहीत, हे विसरता कामा नये, असेही त्यांनी सूचित केले.
Raigad News: मंगेश काळोखे हत्याकांडात ‘बीड’ कनेक्शन! आमदार थोरवेंचा मास्टरमाईंडबाबत खळबळजनक आरोप
सेक्युलर मतदारांनी सावध राहावे, असा इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार यांना भाजपकडे जाण्यासाठी सध्या पायवाट तयार केली जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचे विलिनीकरण, अजित पवारांचे भाजपसोबत राहणे आणि त्यातून सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणे — हे चित्र जर घडले, तर त्यात आश्चर्य वाटू नये. महाविकास आघाडी सोडून शरद पवार सत्तेत सहभागी होतील का, या थेट प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी होकारार्थी उत्तर दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसमधील अनेक स्थानिक नेते फक्त नावापुरते काँग्रेसमध्ये असून त्यांची आत्मा भाजपमध्ये आहे, असा आरोप त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडीने आधीपासूनच भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली होती आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यांनी ‘नारद मुनीची भूमिका’ घेतल्यामुळे एकत्र येण्याऐवजी विघटन झाले, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
