• Wed. Mar 11th, 2026
    Dharashiv News: विहिरीतली मोटार काढायची होती, पण आक्रित घडलं! बाप लेकासह चौघांना शॉक लागला अन् चौघेही जागेवर…. महाराष्ट्र हळहळला!

    Dharashiv Incident: विहिरीतील पाणबुडी काढताना क्रेनला उच्चदाब वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने धाराशिवमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गावात शोककळा पसरली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रहीम शेख, धाराशिव: नियतीचा खेळ किती क्रूर असावा याचा प्रत्यय आज तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे आला. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि शेतात पाणी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या हातांना आज मृत्यूने कवेत घेतले. शेतातील विहिरीचे काम सुरू असताना एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. क्रेनचा स्पर्श विद्युत वाहिन्यांना झाला आणि डोळ्यादेखत बाप-लेकासह चार जणांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.

    आज (शनिवार) दुपारी एकच्या सुमारास ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. केशेगाव येथील गणपती शिवाप्पा साखरे यांच्या शेतातील विहिरीवर दुरुस्तीचे काम सुरू होते. विहिरीतील बिघडलेली पाणबुडी (सबमर्सिबल मोटर) बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली होती. कष्टाळू हात कामाला लागले होते. मात्र, काळाने तिथेच दबा धरला होता. मोटर वर खेचताना क्रेनचा लोखंडी भाग अचानक वर उचलला गेला आणि दुर्दैवाने वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाला.

    काही कळायच्या आतच विजेचा प्रचंड लोळ खाली उतरला. विद्युत प्रवाहाचा इतका जबर धक्का बसला की, तिथे काम करणाऱ्या चौघांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. एका क्षणात हसते-खेळते जीव निपचित पडले. या घटनेत कासिम कोंडीबा फुलारी (वय ५४) आणि त्यांचा अवघ्या १६ वर्षांचा कोवळा मुलगा रतन कासिम फुलारी यांचा जागीच मृत्यू झाला.

    Maharashtra TimesLatur News: अन्नदात्याचा असा शेवट नको रे देवा! डोळ्यांदेखत शेतकऱ्याचे तुकडे; लातूरमधील घटनेने मन सुन्न
    बापाच्या मदतीला आलेला रतन जगाचा निरोप घेऊन गेला. तर त्यांच्यासोबतच रामलिंग नागनाथ साखरे (वय ३०) आणि नागनाथ साखरे (वय ५५) या दोघांचाही या दुर्घटनेत करुण अंत झाला.

    एकाच वेळी गावातील चार जणांचा असा तडफडून मृत्यू झाल्याने केशेगाववर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. “पाणी काढायला गेले, पण स्वतःचा जीव देऊन आले,” असे म्हणत ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शेतीकामातील सुरक्षिततेचा आणि महावितरणच्या तारांच्या जाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अवघ्या १६ वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा असा अंत पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा