• Sat. Mar 7th, 2026

    Mumbai News: धारावी पुनर्विकासाला गती, 40 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाचे काम सुरू; 6.5 एकर रेल्वे जमिनीचा कसा होणार कायापालट?

    Mumbai News: धारावी पुनर्विकासाला गती, 40 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाचे काम सुरू; 6.5 एकर रेल्वे जमिनीचा कसा होणार कायापालट?

    Dharavi Redevelopment: धारावी पुनर्विकास प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून, या वर्षी 6.5 एकर रेल्वे जमिनीवर काम सुरू केले आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला असून आता त्या जमिनीचा कायापालट होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला 2025 मध्ये अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या तब्बल 40 वर्षांपासून रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता आदानी समूहाकडून राबवण्यात येत आहे. यंदा 6.5 एकर रेल्वे जमिनीवर प्रत्यक्ष काम सुरू झाले असून, येत्या काही वर्षांत या परिसराचा संपूर्ण कायापालट होणार आहे.

    महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशात जागेवरच पुनर्वसनासाठी अपात्र ठरलेल्या रहिवाशांसाठी विविध ठिकाणी भूखंड उपलब्ध करून दिल्यानंतर ही महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन एका विशेष उद्देश कंपनीद्वारे (Special Purpose Vehicle – SPV) केले जात आहे. ही कंपनी राज्य सरकार आणि खाजगी भागीदार यांच्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर कार्य करते.

    या आराखड्यानुसार जमिनीची संपूर्ण मालकी राज्य सरकारकडे राहणार असून, पुनर्विकासासाठी आवश्यक विकास हक्कांचा प्रीमियम SPV कडून भरला जाणार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा मानला जाणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी ही रचना ‘अंमलबजावणीयोग्य मार्ग’ म्हणून तयार करण्यात आली आहे.

    चार टप्प्यांचे सर्वेक्षण पूर्ण

    धारावी परिसरातील चारही टप्प्यांचे वैज्ञानिक सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. या माहितीच्या व्यवस्थापनासाठी धारावीचा पहिला ‘डिजिटल ट्विन’ सादर करण्यात आला असून, हा संगणकीय मॉडेल जलद विवाद निराकरण, पारदर्शक निर्णय प्रक्रिया आणि भविष्यवेधी प्रशासनासाठी वापरला जाणार आहे.

    कसा होणार कायापालट?

    धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट जवळपास दहा लाख रहिवाशांचे पुनर्वसन करणे आणि पुढील सात वर्षांत सुमारे 1.25 लाख घरे उपलब्ध करून देणे हे आहे. त्यामुळे हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या शहरी नूतनीकरण प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे.

    या मास्टर प्लॅनमध्ये शाश्वत टाउनशिपच्या दृष्टीने पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा वापर आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रकल्प अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असला तरी, प्रसिद्धीपत्रकानुसार 2025 हे वर्ष ‘फक्त आराखड्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल’ करणारे ठरणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा