• Tue. Mar 17th, 2026

    Jalgaon : महायुतीच्या नेत्यांची गुप्त बैठक अन् राष्ट्रवादीला पत्ताच नाही, जळगावच्या राजकारणात पडद्यामागे काय सुरु?

    Jalgaon : महायुतीच्या नेत्यांची गुप्त बैठक अन् राष्ट्रवादीला पत्ताच नाही, जळगावच्या राजकारणात पडद्यामागे काय सुरु?

    जळगावच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी सुरु आहेत. आगामी काळात जळगाव महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : सध्या निवडणुकांचा निकाल लागून चार दिवस उलटले आहे आणि नगर परिषदेच्या निकालांमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्के सहन करावे लागले आहेत. विशेष म्हणजे भाजपला मोठा धक्का मानावा लागला आहे. पण जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का लागू नये म्हणून महायुतीचे घोंगडे नाचू लागलेले आहेत. भाजप आणि शिवसेना या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जळगावच्या एका हॉटेलमध्ये सायंकाळी पार पडली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र प्रसारमाध्यमांच्या कॅमेरातून ही बैठक देखील सुटली नाही.

    या बैठकीला भाजप आणि शिवसेना हेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र त्यांचा मित्रपक्ष असलेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साधे या बैठकीचे निमंत्रण देखील देण्यात आले नव्हते. या बैठकीत जागा वाटपाची देखील चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

    अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला या बैठकीचे साधे निमंत्रण देखील दिले नव्हते. त्यामुळे या बैठकीत दोनच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा केली आणि जागा वाटपाचा फार्म्यूलाही जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती आहे. मात्र यात अजित पवारांच्या पक्षाला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागेल, अशी देखील चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 25 जागांचा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे दिला आहे. भारतीय जनता पार्टी त्यांचा हा प्रस्ताव मान्य करणार नाही इतके मात्र निश्चित आहे.

    भाजप शिवसेनेच्या युतीनंतर सायंकाळी आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीला स्थानिक आमदार म्हणून असलेले सुरेश भोळे यांची त्या ठिकाणी अनुपस्थिती होती किंवा त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण दिले नसावे. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी संजय पवार यांचे मोबाईलवर संभाषण करून दिले. पण पवार हे 25 जागांवर आग्रही असून तळजोडीअंती जवळपास 12 जागा मिळाव्यात हा राष्ट्रवादी पक्षाचा आग्रह असेल. पण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला भाजप अवघ्या 4 जागा देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कमी जागा देण्यात येणार असल्याने त्यांना भाजप शिवसेनेच्या बैठकीत निमंत्रण देण्यात आले नसावे, असा अंदाज वर्तविला जातो आहे

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची देखील काही ठिकाणी बैठक घेण्यात आली होती. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे आपण आघाडी म्हणून निवडणूक लढवावी, असे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना सांगण्यात आले आहे. पण त्यांनी देखील आग्रह हा आमचा आधी महायुती सोबत असेल. जर सन्मानपूर्वक जागा त्यांनी दिल्या नाही तर भविष्यात वेगळा विचार देखील राष्ट्रवादी पक्ष करू शकेल, अशी भूमिका मांडल्याची माहिती आहे.

    नगरपालिकेच्या निकालानंतर भाजपला देखील मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात एकही महाविकास आघाडीचे खाते उघडणार नाही, अशी वलगणा करणारे मंत्री गिरीश महाजन यांना धक्का बसला आहे. त्यांच्याच भाजपला मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. पण जळगाव महानगरपालिकेत भाजपला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची असल्याने भाजपनेच महायुतीचा पुढाकार घेऊन तात्काळ बैठकीचे आयोजन करून भाजप आणि शिवसेनेची युतीची घोषणा जळगाव महानगरपालिकेचे प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.

    जळगाव महानगरपालिकेसाठी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या एकही उमेदवाराने उमेदवारी दाखल केलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा नाही मिळाल्यास राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट हे नक्कीच एकत्र निवडणूक लढवू शकतात यात शंका नाही. पण भाजप राष्ट्रवादीच्या जागा नेमक्या किती सोडणार? यावरतीच जळगाव महानगरपालिकेचे गणित अवलंबून आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा