• Tue. Mar 17th, 2026

    Mumbai AC Local: मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी एसी लोकल, दररोज 100 फेऱ्या सुरू होणार; उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा

    Mumbai AC Local: मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी एसी लोकल, दररोज 100 फेऱ्या सुरू होणार; उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा

    Central Railway: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी एसी लोकल दाखल होणार आहे. यामुळे दररोज तब्बल 100 फेऱ्या सुरू होणार आहे. मे महिन्यात वाढत्या उकाड्यात नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेल्या मध्य रेल्वेवरील प्रवाशांना प्रवासासाठी आता एकूण १०० वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. या लोकलच्या मदतीने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १४ एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे मे महिन्याच्या उकाड्यात एकूण १०० लोकल फेऱ्यांचा दिलासा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.

    मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबई परिसरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्याचा परिणाम प्रवासावर जाणवू लागला आहे. रेल्वे स्थानकांतील बाटलीबंद पाणी असो वा स्थानकाबाहेरील ऊसाचा रस, ताक, शीतपेये, रेल्वे प्रवाशांची पावले तिकडे वळू लागली आहेत. दुपारच्या वेळेत उन्हाचा पारा चढत असल्याने गरम झळा सहन करत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

    Maharashtra TimesMumbai Crime: घटस्फोटाच्या मागणीमुळे पतीचा संताप; 13 वर्षीय मुलासमोरच पत्नीला लोकलसमोर ढकललं, मुलुंड स्थानकात जागीच मृत्यू

    एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होणार

    मध्य रेल्वेने चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीकडे (आयसीएफ) नवीन एसी लोकलची मागणी केली होती. ही लोकल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. एसी लोकलच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान १२ ते १४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सामान्य लोकलच्या ऐवजी एसी लोकल धावतील. लवकरच त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येतील, असे मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

    सद्यस्थितीत मुख्य मार्गासह सीएसएमटी ते पनवेल या हार्बर मार्गावर एसी लोकल धावत आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सात एसी लोकल गाड्या आहेत. त्यांच्या मदतीने एकूण ९४ फेऱ्या चालवण्यात येतात. नव्या लोकलमुळे यात आणखी १२ ते १४ लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. यामुळे मध्य रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०० पार जाणार आहे. उन्हाळा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात १२ एसी लोकल फेऱ्या वाढवल्या होत्या. पश्चिम रेल्वेवर एकूण १३३ एसी फेऱ्या धावत आहेत.

    ‘फेऱ्या वेळेवर चालवा’

    ‘एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे ही निश्चितच स्वागताची बाब आहे. मात्र फेऱ्या वाढवताना सध्याच्या एसी लोकल वेळेत चालवणे गरजेचे आहे. सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या एसी लोकल सातत्याने विलंबाने धावत आहेत. एसी लोकल रद्द होणार असल्यास रेल्वे स्थानकांवर तशी उद्घोषणा करणे गरजेचे आहे. एसी तिकीट काढल्यावर एसी लोकल रद्द असल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागतो,’ अशी प्रतिक्रिया एसी लोकलचे नियमित प्रवासी गणेश कर्वे यांनी दिली आहे.

    Maharashtra TimesThane News : ठाणे-मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्टेशनला ‘धर्मवीर आनंद दिघे स्थानक’ नाव द्या, शिवसेनेची संसदेत मागणी

    तिकीट तपासणी मोहीम राबवावी

    वाढत्या उन्हामुळे प्रथम श्रेणीपेक्षा एसी लोकलमध्ये गर्दी वाढत आहे. अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याने एसीचे तिकीट-पास काढलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे दुपारच्या वेळेत एसी लोकलमध्ये तपासणी मोहीम राबवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा