शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता. काही दिवसांपूर्वीच ही घटना घडली. पण आता शिंदेसेनेचा सूर बदलला आहे.
आपण सगळे एकत्र आलो तर उल्हासनगरात महाविकास आघाडीचा भोपळाही फुटणार नाही, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेजारीच असलेल्या अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी भाजप चा उमेदवार निवडून आल्यानं शिंदेसेना बॅकफूटवर गेली आहे. भाजप सोबत युती करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. २०१७ मध्ये उल्हासनगर महापालिकेची निवडणूक झाली. त्यात एकसंध शिवसेनेनं २५, तर भाजपनं ३२ जागा पटकावल्या होत्या.
ठाकरेंचं ठरलं! राज ठाकरे घेणार लेकाच्या पराभवाचा बदला? दादूचंही प्लानिंग; शिंदेंचा शिलेदार रडारवर
उल्हासनगरात शिंदेसेनेनं ओमी कलानी टीम आणि स्थानिक साई पक्षासोबत जवळीक साधली आहे. गेल्या वेळी कलानी आणि साई यांच्याच मदतीनं भाजपनं आपला महापौर बसवला होता. आता त्यांच्याशी शिंदेसेनेनं हातमिळवणी केली आहे. यानंतर युतीच्या चर्चांना सुरुवात झाली. युतीत शिंदेसेनेनं त्यांच्या वाटणीच्या जागांमधून ओमी कलानी आणि साई पक्षाा जागा सोडाव्यात अशी मागणी भाजपनं केली.
विशेष म्हणजे उल्हासनगरातून झालेल्या फोडाफोडीमधूनच शिंदेसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष पेटला होता. त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत उमटले. पण भूकंपाचा केंद्रबिंदू उल्हासनगर होता. इथले भाजपचे काही माजी नगरसेवक टीम ओमी कलानीमध्ये गेले. तिथून ते शिंदेसेनेत गेले. या सगळ्यामागे स्थानिक खासदार असल्याचा संशय भाजप नेत्यांना होता आणि आजही आहे.
ठाकरे बंधूंचं ठरलं! संजय राऊतांनी उद्याचं लोकेशन सांगितलं; आदित्य ठाकरेंशी खास कनेक्शन
भाजपचे माजी नगरसेवक पक्ष सोडतात आणि स्थानिक पातळीवर कोणतीही सत्ता नसलेल्या ओमी कलानी टीममध्ये प्रवेश करतात आणि मग तिथून शिंदेसेनेत जातात, हा सगळा प्रकार भाजपच्या स्थानिक नेत्यांना संशयास्पद वाटला. यामागे कोण आहे, याचा शोध भाजपनं घेतला. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या पक्ष प्रवेशाचा धडाका प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लावला. याचा निषेध म्हणून शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला. या मंत्र्यांनी फडणवीस यांची भेट घेतली आणि फोडाफोडीचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. तेव्हा सुरुवात कोणी केली, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला होता.
