• Sat. Mar 7th, 2026

    Gulabrao Patil: आम्ही चार जण खांदा द्यायला आलोय…; भाजपवर गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका, साताऱ्यात नेमकं काय म्हणाले?

    Gulabrao Patil: आम्ही चार जण खांदा द्यायला आलोय…; भाजपवर गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका, साताऱ्यात नेमकं काय म्हणाले?

    Satara News: फलटण नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. तर शिवसैनिकांची ताकद दाखवून देऊ, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

    भाजपवर गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका, साताऱ्यात नेमकं काय म्हणाले?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा: फलटण नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी बोलवावं लागण्याची वाईट वेळ इथल्या नेत्यांवर आल्याचे ते म्हणाले. तसंच, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर अप्रत्यक्षपणे टीका करत, आम्ही पुरुषांशी लढतो, बायकांच्या लफड्यात पडत नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही भाजपला इशारा देत, शिवसैनिकांची ताकद दाखवून देऊ, असा इशारा दिला आहे.

    फलटणमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भाषणात टीका करणे टाळले. याउलट, सायंकाळी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत गुलाबराव पाटील यांनी भाजपवर बोचरी टीका केली. “मुख्यमंत्री आले म्हणून आम्ही पण चारजण आलो. चारजण कशासाठी असतात? आम्ही खांदेकरी आहोत. ‘राम बोलो भाई राम, बजा दिया काम’,” असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

    महिला डॉक्टर आत्महत्येच्या घटनेचा संदर्भ देत गुलाबराव पाटील म्हणाले की, “कुठल्या मुलीने, सुनेने आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात माझं कधी नाव आलं नाही.” फलटणमध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागणे ही भाजपची किती वाईट वेळ आहे, यावर त्यांनी भर दिला. “मुख्यमंत्र्यांना नाईलाजाने यावे लागले. किती वाईट वेळ आहे. आय लव्ह यू माय मुख्यमंत्री,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर खोचक टीका केली.

    दरम्यान, यावेळी शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही भाजपला इशारा दिला. ते म्हणाले, “आम्ही शांत असलो तरी कुणी आरे केलं तर त्याच्या दहा पट आवाजात कारे करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. फलटणमध्ये काही झाले तर रामराजे यांनी फक्त हाक मारावी, संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक तिथे येतील,” असं त्यांनी सांगितलं. शिवसेना कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा, असा इशारा देत त्यांनी पुढे म्हटले की, “पालकमंत्री दम देत नाही. मात्र, कुणी अंगावर आला तर पाठ दाखवून पळ काढणे, ही शिवसेनेची कार्यपद्धती नाही. दहा पावलं पुढे जाऊन चाल करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे.”

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा