Political Party: राज्यभरात निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांची नोंदणी वाढली असून मे २०२४ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान ३५ नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता एकूण ४३५ पक्षांची नोंदणी असून यातील बहुतांश पक्ष स्थानिक पातळीवरचे असून त्यांच्या नोंदणीचे पत्ते व्यक्तींच्या घरांचे आहेत.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील विधानसभा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार, हे स्पष्ट होते. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यापासून विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या अवघ्या सहा महिन्यांच्या काळात राज्यभरात ११ नव्या पक्षांची नोंदणी करण्यात आली. तर विधानसभा निवडणूक झाल्यापासून ते ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण २५ पक्ष राज्यात उदयास आले आहेत. यातील बहुतांश पक्ष हे स्थानिक पातळीवरचे राजकारण करणार असून त्यांच्या नोंदणीचे पत्ते व्यक्तींच्या घराचे आहेत.
तीन वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट पडल्याने दोन नव्या राज्यस्तरीय पक्षांची राजकारणात भर पडली. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी १९३९ साली पश्चिम बंगालमध्ये स्थापन केलेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने जानेवारी २०२३मध्ये, तर तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांनी स्थापन केलेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने मार्च २०२३ मध्ये राज्यात प्रवेश करत नोंदणी केली आहे.
राजकीय पक्षांच्या स्थापनेनंतर त्यांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे करावी लागते. या पक्षांची विभागणी ही राष्ट्रीय पक्ष, महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय पक्ष, इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्ष आणि आयोगाकडील नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष अशा चार वर्गांत केली जाते. सध्याच्या घडीला राज्यात पाच राष्ट्रीय पक्ष असून तितकेत राज्यस्तरीय पक्ष आहेत. इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांची संख्या एकूण नऊ आहे. अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची संख्या मात्र तब्बल ४१६ इतकी आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पक्षांची नोंदणी झाली असून त्यापाठोपाठ मराठवाडा आणि विदर्भात राजकीय पक्ष नोंदविले गेले आहेत. मुंबईत तीन, तर ठाणे जिल्ह्यात दोन नव्या पक्षांची नोंदणी गेल्या दीड वर्षांत झाली आहे.
