• Wed. Mar 11th, 2026

    Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नव्या राजकीय पक्षांचं पीक; किती पक्ष वाढले? जाणून घ्या…

    Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नव्या राजकीय पक्षांचं पीक; किती पक्ष वाढले? जाणून घ्या…

    Political Party: राज्यभरात निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांची नोंदणी वाढली असून मे २०२४ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान ३५ नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता एकूण ४३५ पक्षांची नोंदणी असून यातील बहुतांश पक्ष स्थानिक पातळीवरचे असून त्यांच्या नोंदणीचे पत्ते व्यक्तींच्या घरांचे आहेत.

    लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नव्या राजकीय पक्षांचं पीक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    अनुराग कांबळे, मुंबई : राज्यभरात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वेळ असल्याने भारंभार राजकीय पक्षांच्या नोंदणीला सुरुवात झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मे २०२४ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत राज्यभरात एकूण ३५ नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. राज्य निवडणुक आयोगाकडे एकूण ४३५ राजकीय पक्षांची नोंदणी असून यातील १६८ पक्षांची, म्हणजेच जवळपास ३० टक्के पक्षांची नोंदणी ही गेल्या पाच वर्षांतील आहे.

    लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील विधानसभा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार, हे स्पष्ट होते. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यापासून विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या अवघ्या सहा महिन्यांच्या काळात राज्यभरात ११ नव्या पक्षांची नोंदणी करण्यात आली. तर विधानसभा निवडणूक झाल्यापासून ते ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण २५ पक्ष राज्यात उदयास आले आहेत. यातील बहुतांश पक्ष हे स्थानिक पातळीवरचे राजकारण करणार असून त्यांच्या नोंदणीचे पत्ते व्यक्तींच्या घराचे आहेत.

    तीन वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट पडल्याने दोन नव्या राज्यस्तरीय पक्षांची राजकारणात भर पडली. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी १९३९ साली पश्चिम बंगालमध्ये स्थापन केलेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने जानेवारी २०२३मध्ये, तर तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांनी स्थापन केलेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने मार्च २०२३ मध्ये राज्यात प्रवेश करत नोंदणी केली आहे.

    राजकीय पक्षांच्या स्थापनेनंतर त्यांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे करावी लागते. या पक्षांची विभागणी ही राष्ट्रीय पक्ष, महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय पक्ष, इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्ष आणि आयोगाकडील नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष अशा चार वर्गांत केली जाते. सध्याच्या घडीला राज्यात पाच राष्ट्रीय पक्ष असून तितकेत राज्यस्तरीय पक्ष आहेत. इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांची संख्या एकूण नऊ आहे. अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची संख्या मात्र तब्बल ४१६ इतकी आहे.

    लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पक्षांची नोंदणी झाली असून त्यापाठोपाठ मराठवाडा आणि विदर्भात राजकीय पक्ष नोंदविले गेले आहेत. मुंबईत तीन, तर ठाणे जिल्ह्यात दोन नव्या पक्षांची नोंदणी गेल्या दीड वर्षांत झाली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा