उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी पुणे महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा असताना बारामतीत आज वेगळी घटना बघायला मिळाली. अजित पवार यांनी बारामतीत आपली उद्विग्नता भाषणात व्यक्त केली.
“तुम्ही 1991 पासून माझ्यावर प्रेम केलं, साथ दिली. पण आजही घरातले काही लोक साथ देत नाहीत. मात्र, तुमच्या विश्वासामुळेच मी अहोरात्र काम करतो”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. या विधानातून त्यांनी पुन्हा एकदा चालू राजकीय घडामोडींमध्येही कौटुंबिक अंतर असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
अजित पवार यांनी यावेळी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. “विरोधक निवडणूक आली की बारामतीत येतात, बाकी पाच वर्ष कुठे असतात? गल्ल्या–बोळ दाखवून बारामतीची बदनामी करतात. पण बारामतीचा सर्वांगीण विकास फक्त मी करू शकतो. निवडणुकीत बदनामी करण्याचे प्रयत्न विधानसभेच्या वेळीही झाले होते. बाहेरची लोक येतील, बोलतील; पण त्यांना बारामतीचे काही देणेघेणे नाही. त्यांच्या नादी लागू नका, फक्त माझा नाद करा”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
Raigad Politics : उरणमध्ये शिवसेनेत मोठा भूकंप, पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
अजित पवारांनी भाषणात विविध प्रकल्पांची माहिती दिली. “55 कोटींचं नर्सिंग कॉलेज आणि 10 एकरात कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा निर्णय, 12 कोटींचं सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी आणि बारामतीला IIT आणि IIM मिळवण्याचा प्रयत्न आहे. बारामतीला सिंगापूरच्या धर्तीवर स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून निधी आणण्याची ताकद केवळ आपल्याकडे आहे”, असं अजित पवार म्हणाले.
Manikrao Kokate : ‘नैतिक जबाबदारी स्वीकारुन…’, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची प्रत समोर, नेमकं काय म्हटलंय?
बारामतीकरांकडून 41 पैकी 41 जागांची मागणी
“नगरपरिषदेमध्ये नगरसेवक कमी आले तर माझीच अडचण होते. तुम्ही उमेदवार कोण आहे ते पाहू नका, मी आहे ना! काम करून घेण्याची जबाबदारी माझी,” असे म्हणत त्यांनी सर्व 41 जागांवर समर्थनाची मागणी केली. “मी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित कार्यकर्ता आहे. जात-धर्माचा विचार आम्ही कधी केला नाही. माझ्या वडिलधाऱ्यांची तीच शिकवण आहे”, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या राजकारणाला जोरदार उत्तर दिले.
