• Sun. Jun 7th, 2026

    कोकाटेंमुळे राष्ट्रवादीचे ‘भुज’बळ क्षीण, दोघा मंत्र्यांमुळे अजितदादा बॅकफूटवर, नाशिकचा गडही संकटात

    कोकाटेंमुळे राष्ट्रवादीचे ‘भुज’बळ क्षीण, दोघा मंत्र्यांमुळे अजितदादा बॅकफूटवर,  नाशिकचा गडही संकटात

    Nashik News : माणिकराव कोकाटेंच्या बेफिकीरीमुळे त्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतानाच, राष्ट्रवादीचा नाशिकचा गडही संकटात आणला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आजारामुळे जायबंदी झाले असताना दुसरीकडे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंवर अटकेसह अपात्रतेची टांगती तलवार लटकल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यात राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे. उच्च न्यायालयात कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर त्यांची जेलवारी निश्चित आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भरवशाचा दुसरा बिनीचा शिलेदारही गमवावा लागणार आहे. या निर्णयामुळे कोकाटेंचे राजकीय भविष्यही आता दावणीला लागले आहे. कोकाटेंच्या बेफिकीरीमुळे त्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतानाच, राष्ट्रवादीचा नाशिकचा गडही संकटात आणला आहे.

    नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद असून, जिल्हा परिषदेतील सत्तेपाठोपाठ राज्यात सर्वाधिक सात आमदार नाशिकमधून निवडून दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी नाशिक जिल्ह्याला तीन मंत्रिपदे बहाल केली आहेत. मात्र, छगन भुजबळ वगळता अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ आणि क्रीडामंत्री ॲड. कोकाटेंच्या मंत्रिपदामुळे राष्ट्रवादीला बळ मिळण्याऐवजी पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.
    Maharashtra TimesPune News : वडिलांच्या निधनानंतर पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड, शिंदेंच्या शिवआरोग्य विभाग शहराध्यक्षावर मोठी कारवाई
    ओबीसी चळवळीला बळ देणाऱ्या छगन भुजबळांना शह देण्यासाठी अजित पवार ांनी कोकांटेचा प्यादा पुढे केला. मात्र, मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर कोकाटेंनी अजित पवार आणि पक्षाला बळ देण्याऐवजी पक्षासह स्वत:चे राजकीय भविष्यही खराब करून घेतले आहे. बेफिकिरी, नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये आणि विधिमंडळातील रमी खेळामुळे कृषी मंत्रिपदावरून पायउतार होऊन क्रीडा मंत्रिपदावर समाधान मानावे लागले. मात्र, सदनिका घोटाळा प्रकरणामुळे आता कोकाटे यांचे राजकीय भविष्यच आता टांगणीला लागले आहे.

    पाच वेळा आमदारकी आणि मंत्रिपद असा दीर्घ राजकीय अनुभव असतानाही दैव देते अन् कर्म नेते अशी गत माणिकराव कोकाटे यांची झाली आहे. नाशिकचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी अजित पवारांची धडपड सुरू असताना एकीकडे भुजबळ जायबंदी झालेत, तर दुसरीकडे कोकाटेंनी आपली विकेट फेकली आहे. त्यामुळे महापालिका आणि पाठोपाठ येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नाशिकचा गड गमावण्याचेही संकट पक्षासमोर उभे ठाकले आहे.
    Maharashtra TimesBMC Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईतील अस्तित्व धोक्यात? भाजपचा मोठा गेम प्लॅन, बडा नेता गळाला, पण ‘घड्याळ’ काटे फिरवणार
    ॲड. कोकाटेंना नंदुरबारचे पालकमंत्रिपद मिळाले असले तरी त्यांचा डोळा नाशिकच्या पालकमंत्रिपदावर होता. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीचा दावा योग्य होता. मात्र, कोकाटेंना पालकमंत्रिपद मिळाले तर नाशिकवर वर्चस्व ठेवणाऱ्या भाजपच्या एका मंत्र्यासह राष्ट्रवादीतल्या एका गटाची अडचण होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतूनही भाजपच्या नेत्यांना कोकाटेंविरोधात बळ मिळाले. वादग्रस्त कोकाटे स्वपक्षीयांसह भाजपच्या चक्रव्यूहात अडकल्याने त्यांचे राजकीय भविष्य आता धूसर बनले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा