Nawab Malik Ajit Pawar: मंगळवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावण्यात न आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीत घेतले नाही तर स्वबळावर मुंबईत ५० जागांवर पक्षाने निवडणूक लढवावी, असे नियोजन पक्षाकडून करण्यात आले असून त्याविषयीची महत्त्वपूर्ण चर्चा आज, बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी करण्यात येणार आहे. महायुतीत सहभागी होण्यासाठी अजित पवार मलिक यांना दूर ठेवणार की स्वबळावर निवडणूक लढवणार, हे मात्र आता पाहावे लागणार आहे.
BMC Elections : पडद्यामागची मोठी बातमी आली! महायुतीच्या 142 जागांचा तिढा सुटला, कोण किती जागा लढवणार?
मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने केली असून आता पक्षांतर्गत बैठकांची मालिका सुरू झाली आहे. त्यातच मुंबईत शक्ती क्षीण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई अध्यक्ष बनविण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, मलिक यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप असल्याने त्यांच्या नावाला भाजपची हरकत होती, त्यामुळे मलिक यांना थेट मुंबई अध्यक्ष असे पद न देता पक्षाने मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करून त्याचे अध्यक्ष मलिक यांना करण्याची शक्कल लढवली. तरीही भाजपकडून सातत्याने मलिक यांचे नाव पुढे करत त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला महायुतीत घेता येणार नाही, अशी जाहीर भूमिका मांडली आहे.
मुंबईत विभागनिहाय आढावा
नवाब मलिक यांनी शहरातील विभागनिहाय बैठका घेऊन २२७ प्रभागांपैकी कोणत्या भागात पक्षाची ताकद आहे, कुठे उमेदवार दिल्यास तो निवडून येऊ शकतो याची चाचपणी केली. आतापर्यंतच्या बैठकांमध्ये ५० जागांवर पक्षाने निवडणूक लढवली तर यश पदरात पडू शकेल, असा निष्कर्ष निघाला असून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. मंगळवारी नेत्यांकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. याबाबतचा अहवाल बुधवारी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना देण्यात येणार आहे.
BMC Election: शिंदेसेनेकडून 125 जागांची मागणी, भाजपनं ‘ती’ यादीच पाठवली; आकडा पाहून सेनेत तीव्र नाराजी
‘अंतिम निर्णय नेतृत्वाचा’
‘महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी नवाब मलिक यांना दूर करायचे की त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवायची याचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घेतील’, असे आमदार सना मलिक-शेख यांनी मंगळवारी स्पष्ट केले. समितीला पक्षाने दिलेले काम पूर्ण केले असून या निष्कर्ष आणि शिफारशींविषयी जिल्ह्याच्या संपर्कमंत्री आदिती तटकरे यांना सांगण्यात येईल. तसेच अध्यक्ष अजित पवार यांच्यापुढे ते मांडण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. तसेच महायुतीतील जागावाटपासाठी पक्षाकडून कोणाला पाठवायचे याचा निर्णयही पक्षश्रेष्ठीच घेणार असून त्याविषयी काहीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.
