• Sun. Mar 8th, 2026

    Mumbai-Nashik Highway: ठाण्यातील महत्त्वाच्या मार्गावर आजपासून चार महिने वाहतूक बंदी; पर्यायी मार्ग कोणते?

    Mumbai-Nashik Highway: ठाण्यातील महत्त्वाच्या मार्गावर आजपासून चार महिने वाहतूक बंदी; पर्यायी मार्ग कोणते?

    Majiwada Traffic Diversion: मुंबई-नाशिक महामार्गावर रस्ता रुंदीकरण आणि खारेगाव भुयारी मार्गावरील तांत्रिक कामांमुळे 15 डिसेंबरपासून पुढील चार महिने वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. माजिवाडा ते वडपे दरम्यान वाहतूक वळवण्यात आली असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील एका महत्त्वाच्या मार्गावर आजपासून (15 डिसेंबरपासून) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे हे बदल पुढील चार महिने लागू राहणार आहेत. माजिवाडा ते वडपे दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या पट्ट्यातील वाहतूक वळवण्यात आली आहे.

    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या प्रकल्पाचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खारेगाव भुयारी मार्गावर तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असून, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक बंदी जाहीर करण्यात आली आहे. ही बंदी आजपासून लागू होऊन थेट 9 एप्रिल 2026 पर्यंत राहणार आहे. परिणामी, पुढील चार महिने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ही वाहतूक बंदी 24 तास लागू राहणार असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    Maharashtra TimesThane Water Cut: ठाणेकरांवर जलसंकट कायम! शहरात 50 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय; जाणून घ्या कधीपर्यंत

    मुंबई-नाशिक महामार्गावरून दररोज मुंबई, ठाणे, कळवा, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शेकडो वाहनांची वर्दळ असते. ही वाहने माजिवाडा ते वडपे या पट्ट्यातून प्रवास करतात. मात्र, रस्ता अरुंद असल्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर खारेगाव भुयारी मार्गावर MSRDC कडून तांत्रिक कामे केली जाणार असल्याने वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. ही बंदी पुढील चार महिने कायम राहणार आहे.

    पर्यायी मार्ग कोणते?

    मुंबई-नाशिक महामार्गावरून खारेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका, गॅमन रोड, पारसिक चौक किंवा साकेत येथून खाडी पूल मार्गे प्रवास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भिवंडी आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवरही काही ठिकाणी प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांना खारेगाव, पारसिक चौक आणि गॅमन रोड मार्गे वळवण्यात येणार आहे, तर ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कळवा खाडी पूल हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.

    विश्वगुरुच्या नादामध्ये एकही मित्रराष्ट्र राहिला नाही; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर चौफेर टीका

    ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून, आपत्कालीन सेवांसाठी ही बंदी लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईसह कळवा–मुंब्रा आणि कल्याण–डोंबिवलीतील अनेक प्रवासी नाशिक, गुजरात, पनवेल आणि कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा