Santosh Deshmukh Case : बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीत संतोष देशमुख यांना मारतानाचे व्हिडिओ दाखवण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या पत्नी आणि भावाला अश्रू अनावर झाले.
या गंभीर प्रकरणातील अभियोग पक्षाने विशेष मकोका न्यायालयात सादर केलेल्या व्हाईस रेकॉर्डिंगच्या पुराव्यावर सुमारे एक तासभर महत्त्वाचा युक्तिवाद झाला. अभियोग पक्ष आणि आरोपींच्या वकिलांमध्ये हा युक्तिवाद झाला. यामुळे अपेक्षित असलेली दोषारोपपत्र निश्चितीची प्रक्रिया आता शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून यापूर्वीच युक्तिवाद पूर्ण झाला.
बीडच्या मांजरसुबा घाटात मोठी दुर्घटना, डिझेलच्या टँकरचा स्फोट
आजच्या सुनावणीत काय घडलं?
आजच्या सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले गेले: सरकारी पक्षाने निशाणी १०० नुसार न्यायालयात अतिरिक्त पुरावा सादर केला. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी दिलेला डेटा मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये कॉपी केल्याबद्दल आणि सरकारी पक्षाकडून वेळोवेळी सादर केले जाणारे नवीन पुरावे आपल्याला मिळत नसल्याबद्दल आक्षेप घेतला. सरकारी पक्षाच्या वकिलांनी आरोपींकडून जाणिवपूर्वक सुनावणीची तारीख वाढवून खटल्याला विलंब केला जात असल्याचा मुद्दा मांडला.विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी ‘नाटक सुरू असल्याच्या’ मुद्द्यावर आरोपी पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मागील सुनावणीत विशेष मकोका न्यायालयाने घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडत नसल्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना तपास यंत्रणांना दिल्या होत्या. यावेळी विशेष सहाय्यक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभाग घेतला. आरोपी पक्षाच्या वतीने अॅड. दिग्वीजय पाटील आणि अॅड. विकास खाडे यांनी आरोपींची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पटवदकर यांनी प्रकरणाची पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय दिला.
Beed News: ‘…तर महाराष्ट्र बंद’, संतोष देशमुख हत्या प्रकरणासंबंधी घडामोडीवर मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा, नेमकं काय घडतंय?
काय होते प्रकरण?
सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्येसह, ‘अवादा’ कंपनीला खंडणी मागणे आणि याच कंपनीच्या प्रकल्पावरील भांडण अशा तीन प्रकरणांचा एकत्रित तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाने केला आहे. या प्रकरणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. हत्येच्या घटनेला एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित झालेले नाही.
