• Mon. Mar 16th, 2026
    माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास

    Shivraj Patil Chakurkar passed away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

    शिवराज पाटील चाकूरकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं. आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लातूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने शिवराज पाटील चाकूरकर यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

    शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. देशातील संवैधानिक प्रक्रियेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.

    शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लातूरमधील “देवघर” या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकालीन आजारपणामुळे घरच्या वातावरणातच त्यांच्यावर उपचार सुरु होते.

    कोण होते शिवराज पाटील चाकूरकर ?

    शिवराज पाटील यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात झाला. ते लातूरसह मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता. २००४ मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. २००४ ते २००८ या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले.
    Maharashtra TimesRaj Thackeray : गुन्हा कबूल आहे का? सहकार्य कराल तर… कोर्टाचा प्रश्न, राज ठाकरेंचं चार शब्दात उत्तर, अवघ्या काही मिनिटात…
    यापूर्वी त्यांनी १९८० च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तर १९९१ ते १९९६ दरम्यान ते लोकसभेचे १० वे अध्यक्ष होते. पुढे गृहमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर २०१० ते २०१५ या काळात ते पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक होते.
    Maharashtra TimesManikrao Kokate : विधानसभेला ठाकरेंच्या शिलेदाराची उघड मदत, कोकाटेंकडून परतफेड, भाजपचा फायदा टाळण्यासाठी मोठी ‘चाल’

    मुंबईवरील हल्ल्यानंतर टीकेची झोड

    २००८ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर शिवराज पाटील यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या हल्ल्यांना कारणीभूत ठरलेल्या सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारली होती. देशावर एवढे मोठे संकट आले असतानाही त्यावेळी गृहमंत्रिपदावर असलेल्या शिवराज पाटील यांनी वेशभूषा बदलण्यावर भर दिल्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा