Shivraj Patil Chakurkar passed away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. देशातील संवैधानिक प्रक्रियेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.
शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लातूरमधील “देवघर” या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकालीन आजारपणामुळे घरच्या वातावरणातच त्यांच्यावर उपचार सुरु होते.
कोण होते शिवराज पाटील चाकूरकर ?
शिवराज पाटील यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात झाला. ते लातूरसह मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता. २००४ मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. २००४ ते २००८ या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले.
Raj Thackeray : गुन्हा कबूल आहे का? सहकार्य कराल तर… कोर्टाचा प्रश्न, राज ठाकरेंचं चार शब्दात उत्तर, अवघ्या काही मिनिटात…
यापूर्वी त्यांनी १९८० च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तर १९९१ ते १९९६ दरम्यान ते लोकसभेचे १० वे अध्यक्ष होते. पुढे गृहमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर २०१० ते २०१५ या काळात ते पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक होते.
Manikrao Kokate : विधानसभेला ठाकरेंच्या शिलेदाराची उघड मदत, कोकाटेंकडून परतफेड, भाजपचा फायदा टाळण्यासाठी मोठी ‘चाल’
मुंबईवरील हल्ल्यानंतर टीकेची झोड
२००८ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर शिवराज पाटील यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या हल्ल्यांना कारणीभूत ठरलेल्या सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारली होती. देशावर एवढे मोठे संकट आले असतानाही त्यावेळी गृहमंत्रिपदावर असलेल्या शिवराज पाटील यांनी वेशभूषा बदलण्यावर भर दिल्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती.
