Mumbai News: या मोहिमेत आस्थापनांनी अग्नि सुरक्षेबाबतच्या अटी व शर्ती यांचे अनुपालन केले नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
‘दोन दिवसांपूर्वी गोव्यातील एका नाइट क्लबला आग लागून अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, साहित्य आणि उपकरणांसह मुंबई अग्निशमन दल सज्ज आहे’, असे याबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले. आगीच्या घटना घडू नये यासाठी व्यापक जनप्रबोधन केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात, यासाठी मुंबई अग्निशमन दल सतत प्रयत्नशील असल्याचेही जोशी म्हणाल्या.
Mumbai Fraud: स्वस्त सोन्याचा मोह पडला महाग; मुंबईतील भांडीविक्रेत्याची 25 लाखांची फसवणूक, प्रकरण काय?
नियमित होणाऱ्या अग्निसुरक्षा तपासणी व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाकडून गतवर्षी विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील विविध इमारती, हॉटेल, मॉल्स आदींसारख्या संभाव्य गर्दीच्या ७३१ आस्थापना, ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यातील अग्निसुरक्षेविषयक अटी व उपाययोजनांचे अनुपालन न केल्याने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा नुसार १२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. परिणामी अशा ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या नाहीत.
यावर्षीही अग्निशमन दलाकडून मुंबईतील विविध रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बार, पब, लॉजिंग-बोर्डिंग, पार्टी हॉल्स, जिमखाने, बँक्वेट हॉल्स, अतिगर्दी होणारे मॉल्स, तारांकित हॉटेल्स यासारख्या आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी २२ डिसेंबर २०२५ ते २८ डिसेंबर या सात दिवसांत करण्यात येणार आहे. ज्या आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्तींचे पालन केले नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले.
मुलीच्या अॅडमिशनचा जुगाड पडला भारी; महिला कस्टम अधिकाऱ्याने 33 लाख गमावले, नेमकं काय घडलं?
चौपाट्यांवर बोटी, जीवसंरक्षक सज्ज
नववर्षाच्या पूर्वसंध्येस सुरक्षेविषयक उपाययोजना म्हणून विविध समुद्रकिनाऱ्यावरील चौपाट्यांवर जीवरक्षक, बोटी व जीवसंरक्षक साधने यासह मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहेत. आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी किंवा आग लागल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवून जीवितहानी व वित्तहानी रोखण्यासाठी इमारतीमध्ये किंवा आस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांतील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे दायित्व संबंधित मालक, भोगवटादार यांचे असल्याचे मुंबई अग्निशमन दलाने स्पष्ट केले.
अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे बंधनकारक
इमारत किंवा इमारतीच्या भागामधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील प्रस्थापित अग्निशमन यंत्रणा कार्यक्षम स्थितीत असल्याबाबत परवानाधारक अभिकरणाकडून सहामाही प्रमाणपत्र वर्षातून दोनदा ‘नमुना ब’ प्रमाणे जानेवारी व जुलै महिन्यात प्राप्त करून घेणे हे बंधनकारक आहे.
