DHarashiv Crime: धाराशिव जिल्ह्यात एका तरुणाने विवाहबाह्य संबंधांनंतर आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेयसीकडून सतत पैशांची मागणी होत असल्याचा आरोप कुटुंबाने केला असून या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अश्रुबा कांबळे हा रुई ढोकी गावचा रहिवासी होता. गेल्या पाच वर्षांपासून त्याचे धाराशिव येथील साई कला केंद्रातील एका नर्तकीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. अश्रुबाने प्रेयसीसाठी घरातील सोने आणि पैसे दिले होते. तसंच पोस्टातील आरडी मोडूनही त्याने प्रेयसीला पैसे दिले. तरीही, प्रेयसीकडून पैशांची सतत मागणी होत असल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अश्रुबा आणि त्याची प्रेयसी देवदर्शनासाठी शिखर शिंगणापूरला गेले होते. परत येत असताना अश्रुबाच्या पत्नीचा फोन आला. या फोनमुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. भांडण इतकं वाढलं की अश्रुबाने प्रेयसीला आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितलं. मात्र, प्रेयसीने त्याकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षामुळेच अश्रुबाचा बळी गेला, असं बोलले जात आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्न झालेले असतानाही परस्त्रीसोबत प्रेमसंबंध ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे एक उदाहरण आहे. येरमाळा पोलिसांनी प्रेयसीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
