• Sat. Mar 7th, 2026
    पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मुलीची डीएनए टेस्ट करा, पतीच्या मागणीवर पुणे कोर्टाचा मोठा निर्णय

    Pune Crime : लग्नानंतर काही वर्षे सुरळीत संसार केल्यानंतर साहिलकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप पत्नीने केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुलीची डीएनए चाचणी करण्याची एका व्यक्तीची मागणी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने फेटाळून लावली. कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून दोन वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला त्रास देण्यासाठी असा अर्ज केल्याबद्दल पतीला न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे यांनी हा आदेश दिला.

    काय आहे प्रकरण?

    साहिल आणि सना (नावे बदलली आहेत) या दाम्पत्याचे २०१५ मध्ये लग्न झाले. दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली आहेत. त्यापैकी थोरली दहा वर्षांची, तर धाकटी सात वर्षांची आहे. लग्नानंतर काही वर्षे सुरळीत संसार केल्यानंतर साहिलकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप सनाने केला. कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून सना दोन वर्षांपासून विभक्त राहात होती. त्यामुळे साहिलने २०२१ मध्ये सनाशी घटस्फोट घेण्यासाठी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. त्यावर न्यायालयाने दोन्ही मुलींच्या पालनपोषणासाठी दरमहा दोन हजार रुपयांची अंतरिम पोटगी मंजूर केली. हा दावा सुरू असतानाच साहिलने धाकट्या मुलीच्या पालकत्वावर संशय व्यक्त करत तिच्या डीएनए तपासणीसाठी न्यायालयात अर्ज केला.
    Maharashtra TimesCrime News : मीनाक्षी दूर राहू लागली, 8 फेब्रुवारी 2026 तारीख कारण, पोलीस निरीक्षकाने आयुष्य संपवलं, चॅटिंगमध्ये धक्कादायक खुलासे

    महिलेच्या वकिलांचं म्हणणं काय?

    यावर या महिलेच्या वकील ॲड. राणी कांबळे-सोनवणे यांनी तीव्र आक्षेप घेतला. पतीच्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून पत्नी माहेरी राहात असून, पतीही तिथे राहात होता. पती दोन्ही मुलींचे कोडकौतुक करत होता. मात्र, आता त्याने पालकत्व तपासणीसाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
    Maharashtra TimesGoa Nightclub Fire : पत्नीला वाचवलं, तीन मेहुणींना वाचवण्यासाठी पुन्हा आगीत शिरला, पतीसह तिघी जोशी भगिनींचा दुर्दैवी अंत

    कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

    पत्नीला त्रास देण्याच्या हेतूने हा अर्ज करण्यात आला आहे. पालकत्व सिद्ध करणे हे केवळ पालकांपुरते मर्यादित नसून, त्याचा मुलांच्या भवितव्यावरही विपरीत परिणाम होतो, असे सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिवाड्यांत नमूद केले आहे. त्यामुळे पतीचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद पत्नीच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत कौटुंबिक न्यायालयाने पतीचा अर्ज फेटाळून त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा