• Mon. Jun 15th, 2026
    Thackeray Brothers: उद्धव-राज ठाकरे यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा; ‘शिवतीर्थ’वर दोन्ही नेत्यांकडून ऊहापोह

    Thackeray Brothers: शिवतीर्थ निवासस्थानी गुरुवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास उद्धव ठाकरे दाखल झाले. यावेळी त्यांच्यात राज्यातील २९ महापालिकेसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

    raj uddhav thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील २९ महापालिका व त्यातही प्रामुख्याने मुंबई महापालिकेतील जागावाटपाच्या दृष्टीने गुरुवारी (दि.२७) शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाल्याचे समजते. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांनी ही चर्चा केली.

    ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ अशी घोषणा यावर्षी मे महिन्यात उद्धव ठाकरे यांनी वरळी डोममध्ये केली होती. त्यानंतर राज आणि उद्धव यांच्या भेटी वाढत गेल्या आणि या दोन्ही पक्षात राजकीय युती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यामंध्ये भेट झाल्याचे समजते. महापालिकेतील जागावाटपाच्या सूत्राबाबतही चर्चा झाल्याचे समजते. यावेळी उबाठा पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते.
    Maharashtra Timesसेंट्रल रेल्वेसाठी गुड न्यूज! बदलापूर ते कर्जत प्रवास होणार सुस्साट, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकांना केंद्राची मंजुरी
    २०१७च्या महापालिका निवडणुकीत जिंकून आलेल्या जागांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचे सूत्र निश्चित व्हावे, असे उबाठा पक्षाचे म्हणणे आहे. तर, २०२२मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यासह मुंबईतही शिवसेनेची ताकद कमी झाली असल्याने जागावाटपात हा मुद्दा प्रामुख्याने विचारात घ्यावा, वाटप नव्या पद्धतीनुसार व्हावे असे मनसेचे म्हणणे असल्याचे समजते. या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. याशिवाय इतर मनपांमध्ये काँग्रेससोबत युती महत्त्वाची असल्याने त्यांना मुंबईत कसे सामावून घेता येईल, यावरही चर्चा झाल्याचे समजते. जवळपास ६० ते ७० जागांवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचेही समजते.
    Maharashtra Timesकाँग्रेसच्या ‘त्या’ पराभवामागे CIA, मोसादचा हात; माजी खासदार कुमार केतकरांचा सनसनाटी दावा
    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

    निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी दिल्या जाणाऱ्या निकालाबाबतही दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याचे समजते. मनपा निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता फारच कमी आहे, मात्र तरीही निवडणुका खुपच पुढे ढकलल्या गेल्यास काय करायचे, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचेही समजते. सध्या महायुतीत सुरू असलेली धुसफूस आणि मित्रपक्षांकडूनच एकमेकांच्याविरोधात होत असलेल्या पक्ष प्रवेशावरही दोन्ही भावांनी चर्चा केल्याचे समजते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा