Man Killed Co-Worker In Mumbai: मालाड पश्चिम येथे एका व्यक्तीने आपल्याच सहकाऱ्याची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. कामावरून परत येत असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मृत व्यक्ती ही सतत आरोपीची त्याच्या पत्नीच्या सोडून जाण्यावरुन खिल्ली उडवत असत. त्याचा बदला घेण्यासाठी हे भयंकर कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साह आणि मंडल एका केटरिंग फर्ममध्ये काम करत होते. दोघेही मूळचे बिहारमधील मधुबनीचे रहिवासी असल्याची माहिती आहे. एका कामासाठी त्यांना गुरुवारी पहाटे कांदिवलीला जायचे होते. कामावर जात असताना मालाड येथे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.
आईचे कपडे, मेकअप अन् कानातले… सगळं सेम टू सेम, पण एका चुकीने केला भांडाफोड; तीन वर्ष लपवलं धक्कादायक सत्य
त्यानंतर रात्री 12.25 च्या सुमारास, दोघेही लाइफलाइन हॉस्पिटलजवळील एका इमारतीच्या आवारातून जात होते. त्यावेळी मंडलने आपल्यासोबत असलेल्या केटरिंगच्या कामासाठीच्या चाकूने साहचा गळा चिरला. या हल्ल्यानंतर साह एका जवळच्या हॉलमध्ये गेला आणि तिथेच वाट बघत राहिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. साहला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गणेश मंडलला ताब्यात घेतले आहे. मंडलवर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मंडल याचा यापूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. चौकशीदरम्यान मंडलने सांगितले की, त्याची पत्नी पाच वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती आणि दिलखुश साह त्याची नेहमी यावरून खिल्ली उडवत असे.
या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कामाच्या ठिकाणी अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी गणेश मंडलला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
