• Sat. Mar 7th, 2026
    ‘शिवसेनेपुढं कुणाची दहशत चालत नाही’; भाजपविरोधात शिंदे सेना आक्रमक, मंत्र्याने दिला थेट इशारा

    पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला थेट आव्हान देत, शिवसेनेपुढे कोणाचीही दहशत चालणार नाही, असे फलटणमध्ये म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नागरिकांना निर्भयपणे जगता येईल, असे वातावरण निर्माण करू, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दुराव्याच्या चर्चांना दोघांनीही स्पष्टीकरण दिल्यानंतर, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. फलटणमध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना, देसाई यांनी भाजपला डिवचले. ‘शिवसेनेपुढे कोणाचीही दहशत चालणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नागरिकांना निर्भयपणे जगता येईल असे वातावरण निर्माण करू,’ असे वक्तव्य त्यांनी केले. शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि कृष्णा-भिमा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी झाला. यावेळी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, फलटणमध्ये दहशतीचे वातावरण असल्याची चर्चा आहे, पण शिवसेनेपुढे कोणाचीही दहशत चालणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फलटण शहरातील नागरिकांना निर्भयपणे जगता यावे, असे वातावरण आपण निर्माण करू. एकनाथ शिंदे यांच्या नावाला साजेसा दणदणीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

    शंभूराज देसाई यांनी पुढे सांगितले की, फलटणच्या राजे परिवाराने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला आनंद आहे. राजे गटाला डावपेच सांगण्याची गरज नाही. लोकांची सेवा करण्याची परंपरा या कुटुंबाला आहे. एकनाथ शिंदे हे जिवाला जीव देणारे नेते आहेत. २८ तारखेला ते फलटणला येणार आहेत. त्यांच्यारुपाने राज्याचे नगरविकास खातेच फलटणला येणार आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ज्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी असेल, त्याच्यावर कडक कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी नाव न घेता दिला.

    Maharashtra TimesNavi Mumbai: लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, नको ते धंदे करणाऱ्या परप्रांतीयांवर सापळा रचून कारवाई, दोन महिलांची सुटका

    माजी आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले की, फलटण शहर एक नामांकित आणि सुसंस्कृत शहर आहे. रामराजेंनी फलटण तालुक्याला विकासाची दिशा दिली आहे. ते फलटणच्या विकासाचे मास्टरमाईंड आहेत. फलटण शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्व शिवसेनेत आलो आहोत. इथली दहशत संपवायची आहे, असेही वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं.

    रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी ग्वाही दिली की, ‘सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेना ठरवेल. खंबाटकी घाटाच्या अलिकडचा संपूर्ण भाग आम्ही भगवा करुन दाखवू’. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना आता समूळ नष्ट होईल. आपण प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, फलटण शहर व तालुक्याला योग्य दिशेने नेण्यासाठी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय झाला आहे. सर्वसामान्यांची कामे व्हावीत, त्यांना आधार व संरक्षण मिळावे, म्हणून आपण सर्वांनी हा निर्णय घेतला आहे. आता जे काही बरे वाईट होईल ते शिवसेनेतच होईल. हा आपला अंतिम निर्णय आहे.

    नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, आपण शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे फलटणमधील भीतीचे वातावरण दूर होणार आहे. त्यांनी शासकीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याकडे शंभूराज देसाई यांचे लक्ष वेधले. तसेच फलटणच्या विकासासाठी पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा