• Fri. Mar 6th, 2026
    शिवसेना उमेदवाराच्या गाडीने उडवलं, अंबरनाथमध्ये चौघांचा मृत्यू; किरण म्हणाल्या, ड्रायव्हरला फोन आला आणि त्याचा पाय…

    Shiv Sena Candidate Car Accident : अपघातग्रस्त कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबेंची होती

    अंबरनाथ कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : अंबरनाथ उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर ही कार उलटली. या भीषण अपघातात कार चालक, तसेच दुचाकींवरील तीन जण अशा चौघा जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कार चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

    ही कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबेंची होती. त्या सभेसाठी जात असताना हा अपघात घडला असून जखमींमध्ये त्यांचाही समावेश आहे.

    कसा झाला अपघात?

    अंबरनाथ उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी पूर्व भागातून पश्चिमेकडे शिवसेनेच्या नगर परिषद निवडणुकीच्या महिला उमेदवार किरण चौबे आपल्या कारने सभेसाठी चालल्या होत्या. यावेळी वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर एक दुचाकीस्वार थेट उड्डाणपुलाखाली फेकला गेला. इतर वाहन चालक आणि उड्डाणपुलाखालील लोकवस्तीतील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली.

    कार चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघातावेळी कार चालकाचा पाय अॅक्सिलरेटर दाबलेल्या अवस्थेत अडकला होता.

    शिवसेना उमेदवाराने काय सांगितलं?

    पोलिसांना दिलेल्या जबाबात किरण चौबे म्हणाल्या की, गाडी पुलावरून जात असताना चालक लक्ष्मण शिंदे यांना एक फोन आला. फोनवर बोलत असतानाच अचानक त्यांनी बोलणे थांबवले. त्यावर आपण शिंदेंशी काही बोलण्यापूर्वीच, चौबेंना दिसले की चालकाचा पाय अॅक्सिलरेटरवर जोरदार दाबला गेला होता. त्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन वेगाने पुढे जात राहिली आणि क्षणार्धातच अपघातही झाला.

    अंबरनाथ पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    या अपघातात कार चालक लक्ष्मण शिंदे यांच्यासह दुचाकीवरील ४५ वर्षीय शैलेश जाधव आणि ५७ वर्षीय चंद्रकांत अनारके यांचा मृत्यू झाला. हे दोघेही जण अंबरनाथ महापालिका कर्मचारी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर १७ वर्षीय सुमीत चेलानी यालाही अपघातात प्राण गमवावे लागले.

    या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे उड्डाणपूल, कल्याण, बदलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस अधिक तपास करत होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा