ठाण्यात एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा हा गड आता भाजपने काबीज केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःची ताकद दाखवली असली तरी, आता त्यांना ठाण्यातूनच भाजपचे आव्हान मिळत आहे.
शिवसेना एकसंध असतानाच जिल्ह्यातील पक्षाची ताकद कमी कमी होऊ लागली. २०१४ मध्ये शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. भाजपनं ठाण्यातील १८ पैकी ९ जागा जिंकल्या. तेव्हापासूनच ठाण्यात शिवसेनेची पिछेहाट दिसू लागली. भाजप सोबत शिवसेनेनं जिल्ह्यातील गणितं मांडायला सुरुवात केली आणि आपला प्रभाव टिकवला. २०२२ मध्ये एकनाथ शिंदेच भाजपच्या गळाला लागेल. ते मुख्यमंत्री असेपर्यंत भाजपला ठाण्यात मर्यादा येत होत्या. उद्धव ठाकरेंचा पक्ष कमजोर करण्यासाठी भाजपनं ‘काळजावर दगड’ ठेवून काही तडजोडी केल्या. ठाण्यात भाजपवर काही मर्यादा आल्या.
फडणवीसांचा थेट पंगा, शिवसेनेला अनपेक्षित धक्का; शिंदेंनी थेट राजीनामा काढला, काय घडलेलं?
ठाकरेंच्या पक्षातून नेते फुटत असतील, तर ते शिंदेसेनेत जातील, असा एक अलिखित नियम होता. शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत तो कायम होता. त्यानंतर ठाकरेंचे नेते भाजपनंही गळाला लावण्यास सुरुवात केली. पुढे एकमेकांचे नेते फोडायचे नाहीत, असा अलिखित नियम भाजप, शिंदेसेनेत होता. पण पक्षविस्ताराच्या धडाक्यात तो अलिखित नियमदेखील दोघांनी मोडला. त्यामुळेच दोन्ही पक्षातील संघर्ष आज टोकाला गेला आहे.
शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपनं रविंद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं मंत्रिपद दिलं. या मंत्रिपदाच्या जोरावर चव्हाण यांनी ठाण्यात जोर मारला. पण शिंदे मुख्यमंत्री असल्यानं चव्हाण यांना मर्यादा येत होत्या. चव्हाण डोंबिवलीतून निवडून येतात. पण त्यांच्या शब्दाला पालिका प्रशासनात फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. खासदार श्रीकांत शिंदे यांची चलती होती. कारण मुख्यमंत्रिपद घरात होतं. पण शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाताच चव्हाण सुसाट सुटले. त्यातच भाजपनं त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं आणि त्यांना पक्षप्रवेशांचा अक्षरश: सपाटा लावला.
भाजपपुढे निभाव लागेना, एकनाथ भाईंनी मोर्चा वळवला; राज ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराची गोची
रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यावर राज्यभरात लक्ष घालतील, पक्ष वाढवतील, याची शिंदे यांना पूर्ण कल्पना होती. पण ते कल्याण-डोंबिवलीत इतके आक्रमक होतील, थेट माजी नगरसेवक फोडतील, याचा अंदाज शिंदेंना आला नाही. खासदार श्रीकांत शिंदे यांचाही अंदाज चुकला आणि चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय नेते गळाला लावले. त्यात अगदी गेल्याच वर्षी चव्हाण यांच्या विरोधात विधानसभा लढवलेल्या दीपेश म्हात्रे यांचाही समावेश आहे. दीपेश म्हात्रे हे श्रीकांत शिंदे यांच्याजवळचे मानले जात होते. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते ठाकरेसेनेत गेले होते. ते पुन्हा शिंदेंकडे परततील अशी अटकळ होती. पण चव्हाण यांनी त्यांचा भाजप प्रवेश घडवून आणला.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई या पट्ट्यात कधीकाळी शिवसेनेची मोठी ताकद होती. पण आता इथे भाजप रुजला आणि वाढला आहे. अख्ख्या ठाणे जिल्ह्यात भाजपनं शिंदेंची कोंडी करताना नेत्यांची अख्खी फौज उतरवली आहे. ठाण्यात संजय केळकर, नवी मुंबईत गणेश नाईक , कल्याण-डोंबिवलीत दस्तुरखुद्द रविंद्र चव्हाण, अंबरनाथ बदलापुरात किसन कथोरे, ग्रामीणमध्ये कपिल पाटील, पालघरमध्ये हेमंत सावरा असे दिग्गज नेते ठाण्यात सक्रिय आहेत. त्यामुळे शिंदेसेनेसमोरील आव्हानं वाढली आहेत.
