• Mon. Mar 16th, 2026
    ‘हा रडणारा नाही तर लढणारा एकनाथ शिंदे’, अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंची दिल्लीत पहिली प्रतिक्रिया

    एकनाथ शिंदे यांनी आज अचानक दिल्लीत जावून अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जावून भेट घेतली. एकनाथ शिंदे हे महायुतीमधील कुरघोडीच्या घटनांवरुन नाराज आहेत. त्यांनी अमित शाह यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. पण या सर्व वृत्तांचं एकनाथ शिंदे यांनी खंडन केलं आहे. आपण बिहार निवडणुकीत झालेल्या विजयानंतर अमित शाह यांचं अभिनंदन करण्यासाठी भेटीसाठी आलो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नाराजीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण रडणारे नाहीत तर लढणारो आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    “बिहारचं सरकार स्थापन होत आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीचं मलाही निमंत्रण आहे. त्यामुळे मी दिल्लीहून बिहारला निघणार आहे. म्हणून मी बिहारच्या यशाचं अभिनंदन करावं म्हणून गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो. अतिशय चांगली चर्चा झाली. त्यांचं अभिनंदन केलं. बिहारमध्ये एनडीएला मोठा विजय मिळाला. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष म्हणून शिवसेनेलादेखील आनंद आहे. त्यामुळे जाता-जाता अमित शाह यांना भेटणं, त्यांचं अभिनंदन करणं आणि शुभेच्छा देणं हे झालं”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

    ‘मी रडणारा नाही तर लढणारा’

    “मी तक्रारींचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाहीय. हा रडणारा नाही तर लढणारा एकनाथ शिंदे आहे. तुम्ही हे वेळोवेळी पाहिलं आहे. त्यामुळे यात छोट्यामोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

    “नाराजी वगैरे हे सगळं तुमचा कल्पनाविलास आहे. हे सगळं तुम्ही पतंग उडवत असतात. मी आतमध्ये बसलो आहे आणि तुमच्या बाहेर बातम्या सुरु आहे. मी एवढंच सांगतो की, ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा विषय नसतो. त्यामुळे काल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यामधून एवढंच ठरलं की, महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, मतभेद होणार नाही, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. याबाबत प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाने सूचना दिल्या पाहिजेत”, असं मत शिंदे यांनी मांडलं.

    “नाराजीचा विषय नव्हताच. तो विषय महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरचा आहे. स्थानिक पातळीवरचा होता. तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय नव्हता. तो विषय काल संपला आहे. त्या विषयाला मी एवढ्या गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही”, अशीदेखील प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

    “बिहारमध्ये एनडीएमध्ये पाच पक्ष एकत्र होते. पाच पक्षांच्या एकजुटीमुळे प्रचंड मोठं यश एनडीएला मिळालं. बिहारच्या जनतेला पूर्वीचं जंगलराज नको होतं. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकास राज हवं होतं. मोदींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली. त्यांच्यावर विश्वास ठेवला. नितीश कुमार यांनी पूर्वीचा काळ बदलला. त्यामुळे एकजुटीने लढतो तेव्हा यश नक्की येतो. महाराष्ट्रातही आपण एकजुटीची ताकद पाहिली”, असंही शिंदे म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा