• Sat. Mar 7th, 2026
    ‘समृद्धी’ ठरतोय अपघातमार्ग; अकरा महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ जणांनी गमावला जीव, मोठी आकडेवारी समोर

    Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर जीवघेण्या अपघातांची संख्या २०२४मधील ६८ वरून सन २०२५मध्ये ९४ वर गेली आहे, तर अपघाती मृत्यूंच्या संख्येत १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

    samruddhi highway accident(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : देशातील सर्वांत आधुनिक महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या आणि मृत्यू यांमध्ये २६ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू २९ टक्क्यांनी घटले आहेत. रस्तेप्रवास वेगवान होण्यासाठी बांधलेले महामार्ग वाहनचालकांच्या चुकीमुळे मृत्यूचे मार्ग ठरत आहेत.

    सन २०२५मधील शेवटचा दीड महिना उरला आहे. डिसेंबर महिन्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने प्रवासी बाहेर पडतात. यातच बेदरकार आणि भरधाव वाहन चालवल्याने रस्ते अपघातांचे व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ‘सुरक्षित व सुखरूप प्रवासासाठी आवरा वेगाला आणि सावरा जीवाला,’ असे आवाहन रस्ते सुरक्षा कक्ष, परिवहन विभागाने केले आहे.
    Maharashtra Times‘एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, 20 आमदार सोडून जातील’, चंद्रकांत खैरे यांचा धक्कादायक दावा
    यंदा ‘समृद्धी’वर १०७ प्रवाशांनी जीव गमावला आहे. गेल्या वर्षी ९७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यंदाच्या वर्षी नऊ महिन्यांत जीवघेण्या अपघातांसह ज्यामध्ये प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत अशा एकूण अपघातांची संख्या १३१वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघात २६ टक्के वाढले आहेत. यामुळे ‘समृद्धी’वरील वाहनचालक, प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    mumbai nagpur samruddhi highway accident
    mumbai nagpur samruddhi highway accident

    मुंबई-पुणेवर उपाययोजनांना फळ
    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरक्षेसाठी विविध उपाय, अपघातप्रवण क्षेत्रात राबवलेले प्रयोगात्मक उपाय यांचा परिणाम यंदा दिसून आला आहे. यंदाच्या नऊ महिन्यांत द्रुतगती मार्गावरील अपघातांत ५१ नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी हा आकडा ७२ होता. एकूण अपघातांत सहा टक्के वाढ झाली आहे. किरकोळ अपघातांत तब्बल ४४ टक्के वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मार्गावरील वाहने थांबवताना तसेच विश्रांतीनंतर वाहने पुन्हा मार्गावर आणताना चालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे रस्ते सुरक्षा कक्ष, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

    महामार्गांवरील अपघातांची कारणे
    – अतिवेगाने वाहन चालविणे (ओव्हरस्पीडिंग)
    – दीर्घ प्रवासामुळे चालकांना येणारा थकवा
    – रात्रीच्या वेळेस झोपेचा झटका आणि लक्ष विचलित होणे
    – काही ठिकाणी ‘रिफ्लेक्टर’ आणि ‘डिव्हायडर’ यांची दृश्यमानता कमी असणे

    सुरक्षित प्रवासासाठी उपाय
    -स्पीड सर्व्हिलन्स कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे
    -प्रत्येक ५० किमीवर विश्रांती केंद्रे अनिवार्य करणे
    -आपत्कालीन प्रतिसाद केंद्र स्थापन करणे
    -महामार्गावर दरमहा सुरक्षा तपासणी मोहीम राबवणे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा