• Sat. Mar 14th, 2026
    Nashik News: मुंबईतल्या जागावाटपावरुन महायुतीत मिठाचा खडा, मंत्री संजय शिरसाट भाजप नेत्यांवर भडकले

    Sanjay shirsath on ravindra chavan: मुंबई महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याला संजय शिरसाठ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील, असे सांगत शिरसाठ यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी आज नाशिकमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिल आहे. जागा वाटपाचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांना आहे. जोपर्यंत युती अधिकृतपणे होत नाही, तोपर्यंत केलेले भाष्य योग्य नाही, असं शिरसाठ म्हणाले आहेत.

    युती झाल्यावर आम्ही एकत्रच निवडणूक लढवणार आहोत, बाकीच्यांनी केलेल्या स्टेटमेंटला आम्ही महत्व देत नाही, असे म्हणत मंत्री संजय शिरसाठ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट टीका केली आहे.

    Maharashtra Timesना ‘एसआयआर’ ना आणखी काही, ‘या’ एका कारणाने NDA ला मिळाला मोठा विजय, शरद पवारांनी बिहार निवडणूक निकालाचं केलं विश्लेषण

    पुढे मंत्री संजय शिरसाठ म्हणाले की, नाशिक हे शिवसेनेचे आवडते शहर असून, नाशिक महापालिकेवर भगवाच फडकवण्याचा आमचा संकल्प आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये लढण्याचे स्पष्ट केले असून, आम्ही त्यांच्या भूमिकेचा आदर करतो. तर गिरीश महाजन हे ‘संकट मोचक’ म्हणून नाशिकला आले आहेत, हे खरे आहे. जिथे संकट असते तिथे ते जातात, पण याचा अर्थ आम्ही गप्प बसलो आहोत असा घेऊ नका. आम्ही आमच्या बैठकांचे सत्र सुरू ठेवले आहे. कोणतीही निवडणूक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये लढायची नाही, हे आम्ही जाणतो, असे म्हणत मंत्री शिरसाठ यांनी गिरीश महाजनांवरदेखील टीका केली आहे.

    महायुती म्हणून आम्ही एकदिलाने लढलो, तर विजय निश्चित आहे. कोणीही आम्हाला गृहीत धरू नये. नाशिक महापालिकेवर महायुतीचा आणि भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज असल्याचे शिरसाठांनी म्हटले आहे. त्यामुळे नाशकातून बोलताना संजय शिरसाठांनी महायुतीच्या नेत्यांना टार्गेट केलेलं पाहायला मिळालं आहे.

    त्यामुळे एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महायुतीतील प्रत्येक घटक पक्षात चढाओढ दिसून येत आहे. याचाच प्रत्यय हा आज नाशिकमध्ये शिवसेना मुख्य प्रवक्ते आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी केलेल्या जागावाटपाच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा