• Tue. Mar 10th, 2026

    बिहारच्या निकालाने महाराष्ट्रात हादरे! ठाकरेंच्या नेत्याने काँग्रेसला घेरलं, ‘ती’ चूक सांगत चांगलंच सुनावलं

    बिहारच्या निकालाने महाराष्ट्रात हादरे! ठाकरेंच्या नेत्याने काँग्रेसला घेरलं, ‘ती’ चूक सांगत चांगलंच सुनावलं

    Mahavikas Aghadi News: महाराष्ट्राच्या निवडणुकीतून धडा न घेता काँग्रेसने बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यास उशीर केला , असा हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. जागावाटपातील काँग्रेसची भूमिका बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

    बिहारच्या निकालाने महाराष्ट्रात हादरे! ठाकरेंच्या नेत्याने काँग्रेसला घेरलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: “बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने चुका केल्या आहेत. महाराष्ट्रातूनच काँग्रेसने शिकलं पाहिजे होतं. बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांना घोषित करताना उशीर केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला असता तर वेगळे चित्र दिसलं असतं. आता तरी काँग्रेसने ही वृत्ती बदलली पाहिजे,” असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. बिहारमध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवावर दानवे बोलत होते.

    नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीतील सर्व जागांवरील कल हाती आले आहेत. बिहार विधानसभेच्या 243 जागांमध्ये आरजेडी-काँग्रेस आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला तर एनडीए ऐतिहासिक बहुमत मिळवण्याकडे मार्गक्रमण करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता एनडीए 207 तर महाआघाडी 29 जागांवर आघाडीवर आहे. या निकालानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यात बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

    अंबादास दानवे म्हणाले की, “बिहार निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेससह महाआघाडीला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसने महाराष्ट्रासह बिहारमध्ये मोठ्या चुका केल्या आहेत. या चुकांमधून काँग्रेसने शिकायला हवं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना चेहरा म्हणून घोषित करताना वेळ लावला, त्यामुळे नुकसान झालं. प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस जागावाटप करताना मोठा वाटा मागते. मात्र विजयाचे गणित आलं की त्यांचा मोठा पराभव होतो. यामुळे काँग्रेससोबत इतर पक्षांचं देखील नुकसान होतं. काँग्रेसने ही वृत्ती बदलली पाहिजे,” असा सल्ला देखील अंबादास दानवे यांनी दिला आहे.

    दरम्यान, “महाराष्ट्र आणि बिहार निवडणुकीत वेगवेगळी परिस्थिती आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहण्यास इच्छुक आहोत. काँग्रेसने जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत येऊ नये. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांना कमी वेळ मिळतो. यातून नुकसान होत असतं,” असंही अंबादास दानवे म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा