• Sat. Mar 7th, 2026

    क्लासेसच्या सहलीवर काळाचा घाला, काशिद समुद्रकिनारी पोहण्यास गेलेल्या सर, विद्यार्थ्याचा अंत, एक जण जखमी

    क्लासेसच्या सहलीवर काळाचा घाला, काशिद समुद्रकिनारी पोहण्यास गेलेल्या सर, विद्यार्थ्याचा अंत, एक जण जखमी

    रायगडमधील काशिद समुद्रकिनारी पोहण्यास गेलेल्या क्लासच्या सर आणि विद्यार्थ्यांचा अंत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक जण गंबीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनारी शनिवारी 8 नोव्हेंबरला अकोल्याहून सहलीसाठी आलेल्या शॉरवीन क्लासेसच्या गटावर दुर्दैवी घटना घडली. समुद्रातील अचानक आलेल्या प्रचंड लाटेत तिघे वाहून गेले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. या घटनेत राम विठ्ठल कुटे (वय 60, शिक्षक, उमरी वृंदावन नगर, उमरखेड, अकोला) आणि आयुष रामटेके (वय 19, विद्यार्थी) यांचा मृत्यू झाला. तर आयुष बोबडे (वय 17, विद्यार्थी, टी.टी.एम. कॉलेज, केशव नगर, अकोला) याला स्थानिकांनी वाचवले असून त्याच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, शॉरवीन क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक सहलीसाठी रायगड जिल्ह्यात आले होते. हे सर्वजण 5 नोव्हेंबर रोजी अकोल्याहून निघाले व 7 नोव्हेंबरला अलिबाग येथे पोहोचले. शनिवारी दुपारी हा गट मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी गेला. त्यानंतर काही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. समुद्रात पोहताना आयुष रामटेके, आयुष बोबडे आणि शिक्षक राम कुटे यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेत आत ओढले गेले. स्थानिकांनी तत्परतेने मदत केली, परंतु दुर्दैवाने दोन जणांचा जीव वाचवता आला नाही.

    राम कुटे यांचा मृतदेह अलिबाग जिल्हा रुग्णालयात तर आयुष रामटेके याचा मृतदेह मुरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आयुष बोबडे हा विद्यार्थी स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला. त्या विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे अकोला आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांत शोककळा पसरली आहे. गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील 2 अलिबाग सुम्रदकिनारी बुडाले होते.

    स्थानिक प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षारक्षक नेमले असून पर्यटकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. सहलींच्या सुरुवातीच्या हंगामातच घडलेल्या या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा