• Sun. Mar 8th, 2026
    ज्यादा नफ्याचं आमिष, शेअर मार्केटच्या नावाअडून थेट मनी लाँन्ड्रिंग; कोट्यवधींचा खेळ अन् नगरचा प्राध्यापक फसला…

    Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये एका प्राध्यापकाला शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३ कोटी रुपयांना गंडवले. नफ्याचे २२ कोटी दाखवून फसवणूक करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: अहिल्यानगमधून एक धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाला कोट्यवधी रुपयांना गंडवलं असल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. नेमकं कसं झालं आहे? फसवणूक प्रकरण जाणून घेऊयात.

    २२ कोटींचा नफा झाला असा संदेश आल्यानंतर आनंदित झालेल्या प्राध्यापकांचा काही क्षणांतच विश्वासच तुटला. पैसे काढायला गेल्यावर समजलं कंपनीच गायब. तब्बल ३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा हा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमधून समोर आला आहे. हा प्रकार २० सप्टेंबर ते एक नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडला असून, याप्रकरणी साक्षी गुप्ता, जितेन दोषी, विक्रम शहा यांच्यासह आणखी एक अनोळखी इसम असा चौघांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Maharashtra Timesसुजय विखेंवर खासदार निलेश लंकेंचा पलटवार; मनमाड महामार्गावरुन दिलं जोरदार प्रत्युत्तर, रस्ता कधी पूर्ण होणार? हेही सांगितलं

    नफ्याचे आकडे बघून अॅप केलं इन्स्टॉल अन् गुंतवले कोट्यवधी

    राहुरी विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना सोशल मीडियावर मुव्हिंग फॉरवर्ड नावाच्या ग्रुपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवण्यात आलं. नफ्याचे आकडे बघून त्यांनी अॅप डाउनलोड करून हळूहळू ३ कोटींची गुंतवणूक केली. काही दिवसांत त्यांच्या खात्यातील रक्कम २२ कोटींवर पोहोचल्याचं दाखवलं गेलं. मात्र, पैसे काढण्यासाठी अर्ज केल्यावर त्यांना १५ टक्के रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. प्राध्यापकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ना फोन लागला, ना वेबसाइट चालू होती. चौकशीअंती कळालं की कंपनीच अस्तित्वात नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

    सायबर यंत्रणा निष्क्रिय, नागरिकांची टीका

    ३ कोटींची फसवणूक, २२ कोटींचं आमिष, सायबर गुन्हेगारी वाढतेय तरी अहिल्यानगर सायबर पोलिस मात्र गप्प का? डिजिटल अरेस्टनंतर आता शेअर मार्केट स्कॅमचे सत्र अहिल्यानगर जिल्ह्यात घडले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. डिजिटल अरेस्ट, बनावट इन्व्हेस्टमेंट अॅप्स, लोन स्कॅम्स – नागरिकांना गंडा घालण्यासाठी नव्या पद्धती वापरल्या जात आहेत. तरीदेखील स्थानिक सायबर पोलीस यंत्रणा निष्क्रिय अन् थंड बसली आहे, अशी टीका नागरिकांतून होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा