Nagpur Elections: राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे.
प्रवीण कुंटे म्हणाले, “राज्य निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तारखा आणि अटी जाहीर केल्या, त्यात भाजप नेते आशिष शेलार यांच्या भाषणातील सूर आणि आयोगाचे धोरण हे जवळपास सारखेच दिसले. त्यामुळे आम्ही वारंवार केलेला आरोप, की आयोग आणि भाजपमध्ये काही साटेलोटे आहे का? निवडणूक आयोगाचा या पत्रकार परिषदेनेच त्या आरोपाला पुष्टी दिली आहे.”
काँग्रेसचा गड राखण्यासाठी तारेवरील कसरत; भाजप बदला घेणार, रणनीतीही तयार, कोण ठरणार वरचढ?
ते पुढे म्हणाले की, “निवडणूक आता जाहीर झाली आहे, त्यामुळे आम्ही संघटनात्मक तयारीला लागलो आहोत. मी यापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून स्पष्ट भूमिका घेतली होती की, लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद अशा सर्व निवडणुकांप्रमाणेच याही निवडणुका आम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून लढवण्याच्या मानसिकतेत आहोत.”
मात्र, काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “काँग्रेस पक्ष आमच्याशी सन्मानपूर्वक चर्चा करण्यास तयार नसेल, तर आम्ही त्यांना वगळून इतर समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे. या संदर्भात आमच्या पातळीवर प्राथमिक चर्चाही सुरू आहे,” असे प्रवीण कुंटे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “आजपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी या संदर्भात आमचे बोलणे झालेले नाही, तसेच चर्चेसाठी आमंत्रणही आलेले नाही. काँग्रेसला आघाडी करायची की नाही, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेची स्पष्टता होईपर्यंत आघाडी होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे.”
कुंटे पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी शरद पवार गटाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तालुका आणि नगर पातळीवरील बैठकांचे नियोजन सुरू केले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची उमेदवारीसाठी तयारी सुरु असून, पक्ष कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्रपणे किंवा समविचारी पक्षांसोबत निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. असेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण कुंटे म्हणाले.

