• Wed. Jun 17th, 2026

    ठाणे- बेलापूर मार्गाचा होणार कायापालट! 889 कोटींच्या प्रकल्पात उभारणार 3 नवे उड्डाणपूल, पाहा कुठे होणार बांधकाम

    ठाणे- बेलापूर मार्गाचा होणार कायापालट! 889 कोटींच्या प्रकल्पात उभारणार 3 नवे उड्डाणपूल, पाहा कुठे होणार बांधकाम

    Thane – Belapur Road: ठाणे-बेलापूर मार्गाचे चित्र लवकरच बदलणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाढणारी प्रवासी आणि मालवाहतूक लक्षात घेता, या मार्गाचे नूतनीकरण केले जाईल.

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई आणि ठाणे ही शहरे जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर मार्गाचे रूपडे लवकरच पालटणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक प्रचंड वाढणार असल्याने याने या महत्त्वाच्या महामार्गाचे नूतनीकरण आणि तीन नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 889 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

    सध्या ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याशिवाय क्रिस्टल हाऊस ते पावणे, बीएसएफ कंपनी ते हुंदाई शो-रूम आणि रबाळे जंक्शन या ठिकाणी तीन नवीन उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. या तीन पुलांसाठी अंदाजे 619 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून हा निधी ‘हॅम्प’ या केंद्र शासनाच्या योजनेतून मिळणार आहे. तसेच मार्गाच्या नूतनीकरणासाठी स्वतंत्रपणे 227 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांमुळे ठाणे मिरा-भाईंदर, पनवेल उरण आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मार्ग सुसाट होईल. काटई बोगद्याला पूरक असा हा महामार्ग असल्याने दोन्ही दिशेची वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान होईल.

    Maharashtra Timesगुन्हेगारांचे धाबे दणाणले, भाईगिरी करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम, कल्याण पोलिसांचं कौतुक
    सध्या ठाणे-बेलापूर आणि शीव पनवेल हे दोन महामार्ग नवी मुंबई शहरातून जातात. ऐरोली, रबाळे, तुर्भे आदी ठिकाणी दररोज वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन महापालिकेने हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त व आधुनिक स्वरूपात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नूतनीकरणात, खूप खराब झालेल्या ठिकाणी सिमेंट ब्लॉक बदलून नव्याने बसवणे, पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होण्यासाठी गटार बांधणे, तसेच रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करून हरितीकरण करण्याचा आराखडा आहे.

    उड्डाणपूलाचा अपेक्षित खर्च

    • क्रिस्टल हाऊस ते पावणे 110 कोटी
    • रबाळे जंक्शन 171 कोटी
    • बीएसएफ ते हुंदाई शोरूम 338 कोटी

    कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला

    ‘ठाणे-बेलापूर मार्गाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात मार्गाच्या नूतनीकरणासह तीन नवीन उड्डाणपुलांचा समावेश आहे. आगामी कामात प्रवासी आणि मालवाहतुकीत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,’ शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नमुंमपा.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा